Govind Dev Giri Ji Maharaj : जय श्रीराम म्हणत आपण घरी जाऊन झोपणार असू, तर पुन्हा दुष्टचक्र माथी बसायला वेळ लागणार नाही; रणजित सावरकर यांचा इशारा

'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक' आणि 'हिंदु जनजागृती समिती' यांच्या वतीने स्वामीजींच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने १४ फेब्रुवारी रोजी त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

336

स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Govind Dev Giri Ji Maharaj)  यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या वेळी श्रीराम मंदिर ही सुरुवात आहे, असे म्हटले होते. सुरुवातीला यश मिळाले की, पुढचा मार्ग कठीण नसतो. ही जरी सुरुवात झाली असली तरी मार्ग खूप मोठा आहे. प्रचंड अंतर गाठायचे आहे. आमच्या पुढे खूप मोठी आव्हाने आहेत. आपल्याला अनेक लढाया कराव्या लागणार आहेत. केवळ राम मंदिराचे यश म्हणून आपण जय श्रीराम म्हणत घरी जाऊन झोपणार असू, तर पुन्हा दुष्टचक्र माथी बसायला वेळ लागणार नाही. म्हणून आपण काय करू शकतो? राजाने काय करायला पाहिजे ते राजाने केले आहे. पंतप्रधानांनी काय करायला पाहिजे ते पंतप्रधानांनी केले आहे. धर्माचार्यांनी काय केले पाहिजे हे त्यांनी केले आहे. पण जनतेने काय करायचे, तर संतांनी जे सांगितले ते करायचे आहे. जे राजे राजधर्म जाणतात, राष्ट्रधर्म जाणतात तेच राजे सत्तेवर आणणे, हे आपले कर्तव्य आहे आणि जोपर्यंत असे राजे सत्तेवर असतील तोवर शत्रू काही करू शकत नाही, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर म्हणाले.

बुधवार, १४ जानेवारीला दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न झालेल्या स्वामीजींच्या अमृत महोत्सवाच्या सन्मान सोहळ्यात रणजीत सावरकर बोलत होते. हा कार्यक्रम ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने स्वामीजींच्या ( Govind Dev Giri Ji Maharaj) भव्य आणि दिव्य कार्याप्रती कृतज्ञता म्हणून हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, सुदर्शन वाहिनेचे संपादक सुरेश चव्हाणके, भाजपचे आमदार, अधिवक्ता आशिष शेलार, खासदार राहुल शेवाळे, आमदार आणि भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर आणि हिंदु जनजागृती समितीचे (Hindu Janajagruti Samiti) राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

(हेही वाचा Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामीजींचे शब्द प्रत्येक हिंदुस्थानीच्या हृदयात आहेत; सुरेश चव्हाणके यांच्याकडून जुन्या आठवणींना उजाळा)

रामराज्य आणायचे असेल तर भगवान श्रीकृष्णाचा मार्ग अवलंबला पाहिजे

स्वामीजींचा (Govind Dev Giri Ji Maharaj) वीर सावरकर संदर्भातील खूप मोठा अभ्यास आहे. त्यांचे कुठलेही व्याख्यान, प्रवचन वीर सावरकरांचे विचार मांडल्याशिवाय संपत नाही. श्रीराम प्राणप्रतिष्ठापना दिनी मी जे स्वामीजींचे भाषण ऐकले, त्याचे तात्पर्य वीर सावरकर यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर ते असे होते की ”जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा !” सुदैवाने महाराज श्रीकृष्ण जन्मभूमीचेही काम सांभाळत आहेत. आपल्याला जर रामराज्य आणायचे असेल तर भगवान श्रीकृष्णाची नीती अवलंबली पाहिजे. मला विश्वास आहे की, तुमच्या नेतृत्वाखाली लवकरच मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीही मुक्त होईल आणि मग पुढच्या भारताचे जे भवितव्य आहे त्याला कुणी रोखू शकत नाही. रामराज्याची कल्पना गुरु वशिष्ठ यांच्या शिवाय करता येत नाही. आज वशिष्ठांच्याच परंपरेचे पाईक असलेले महाराज आहेत. त्यांचे मार्गदर्शन असेच आपणा सर्वांना मिळत राहो. ही प्रभू श्रीरामचंद्राजवळ प्रार्थना आहे, असे रणजित सावरकर म्हणाले.

स्वामींनी संन्यास घेतला आणि राष्ट्र कार्यही केले 

अध्यात्माकडून राष्ट्रीयत्वाकडे जाणे हे त्यांचे मुख्य तात्पर्य आहे. माझे आजोबा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांच्यावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव होता. स्वामी विवेकानंद यांचे विचार आपण आत्मसात करावे, त्यांच्याकडून ते प्रत्यक्ष शिकावे यासाठी बाबाराव यांनी संन्यासही घेण्याची तयारी केली होती. त्यासाठी ते निघालेही होते, पण एक क्षण त्यांच्या मनात विचार आला की, मी संन्यास घेतला तर मला मोक्ष मिळेल पण माझ्या राष्ट्राचे काय? आणि त्याच क्षणी ते परत आले. त्यांनी स्वतःचा मोक्ष सोडला. पण स्वामीजी (Govind Dev Giri Ji Maharaj)  तुम्ही संन्यास घेतला आणि तरी राष्ट्र कार्यही केले आहे. राष्ट्रासाठी तुम्ही सर्वात मोठे केलेले कार्य म्हणजे श्रीराम मंदिर; कारण राम आमच्या राष्ट्राचा प्राण आहे, असे रणजित सावरकर म्हणाले.

(हेही वाचा : Govind Dev Giri Ji Maharaj : स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत व्हावे; रमेश शिंदे यांनी केला गुणगौरव)

श्रीरामाला ७८ वर्षे वाट बघावी लागली

वीर सावरकर म्हणाले होते, जेव्हा आपण रामाला विसरू तेव्हा आपल्या देशाचा प्राण जाईल. ५०० वर्षांपूर्वी तेच झाले, तेव्हा रामाचे मंदिर मोडले गेले, आमच्या राष्ट्रावर झालेला हा सर्वात मोठा आघात होता. आमच्या स्वाभिमानावर झालेला आघात होता, हा आघात इतका मोठा होता की, आमच्यातील काही जण स्वाभिमान विसरले होते, स्वत्व विसरले होते. त्या ५०० वर्षांतच मुघलांचे सिंहासन बळकट झाले होते. राम जेव्हा आपण विसरलो तेव्हा आमचे राष्ट्र खच्ची होऊ लागले, हा आमचा इतिहास आहे. पण सगळेच तसे नव्हते या संघर्षात अनेक सैनिक लढले, संत लढले तो संघर्ष ५०० वर्षे सुरू राहिला, त्या संघर्षाने ज्या ज्योती प्रज्वलित झाल्या त्यात काही सूर्यमाला प्रज्वलित झाल्या, त्यातील एक आहे छत्रपती शिवाजी महाराज. मुळात एक हिंदू एक अभिषिक्त राजा होऊ शकतो ही कल्पनाच हिंदूंना मान्य नव्हती. आपण काहीतरी पाप करत आहोत, अशीच भावना हिंदूंची होती. ही गुलामगिरीची दहशत होती. ज्याने हिंदूंच्या मनाचे खच्चीकरण झाले होते. आमच्या विचारांचे विकृतीकरण झाले होते. म्हणून हिंदू अभिषिक्त राजा होऊच शकत नाही. फार तर आपण एखाद्या मुसलमान राजाचे मांडलिक होऊ शकतो. तो मुसलमान राजा कुठला, तर खलिफाने मान्यता दिलेला. त्याच्याकडून पत्र आणायचे आणि त्याच्या आधारे येथे राजा बनायचे, अशा लोकांचे आपण मांडलिक होतो. अशा वेळी शिवाजी राजे अभिषिक्त राजे बनू इच्छित होते. तेव्हा आम्हीच त्यांना विरोध केला. तेव्हा गागाभट्ट उठले आणि त्यांनी सांगितले की, शिवाजी राजे यांना अभिषिक्त राजा होण्याचा अधिकार आहे. अनेक पिढ्यांनंतर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे अभिषिक्त राजा बनले. त्यांचे साम्राज्य महाराष्ट्रातील काही हिश्श्यापर्यंत मर्यादित असले तरीही ते आमचे पहिले हिंदवी साम्राज्य होते. महाराजांच्या त्या कर्तृत्वाने हिंदुस्थानाला उभारी दिली, मराठी मनाला उभारी दिली. त्यानंतर थोरले बाजीराव पेशवे यांच्यामुळे हे साम्राज्य भारतातील दोन तृतीयांश भागात प्रस्थापित झाले. पण दुर्दैव हे आहे की, आमच्याच महाराष्ट्राचा गौरव आमच्याच महाराष्ट्रात कुणालाही माहित नसतो. ५० वर्षांपेक्षा अधिक काळ दिल्ली आपल्या ताब्यात होती. ईदसाठी जेव्हा बादशाहच्या बेगवानना दागिने हवे असायचे तेव्हा महादजी पेशवे यांच्या आदेशानंतरच ते मिळायचे, हे आमचे कर्तृत्व होते. परंतु हे आम्हाला कधी शिकवण्यात आले नाही. म्हणूनच आम्ही आमचाच हा पराक्रम विसरलो. एक पराक्रम झाला की पुन्हा चार पिढ्यांनी झोपायचे. थोरले बाजीराव पेशवे गेले  आणि त्यानंतर मराठ्यांचे राज्य गेले, ब्रिटिशांची गुलामी आपल्या डोक्यावर आली. त्यानंतर आपण स्वातंत्र्य मिळवले, त्याला ७८ वर्षे होऊन गेली. श्रीरामालाही  ७८ वर्षे वाट बघावी लागली. आम्हाला वाटत होते की, आपल्याला हक्काचे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यानंतर आम्हाला राम मंदिर मिळेल पण मंदिरासाठीही ७८ वर्षे वाट पाहावी लागली, असेही रणजित सावरकर म्हणाले.

धर्माला शस्त्राचा आधार नसेल तर तो धर्म पांगळा होतो 

जेव्हा राम जन्मभूमीची घोषणा झाली तेव्हा स्वामीजी ( Govind Dev Giri Ji Maharaj)  तुमच्यावर कोषाध्यक्षाची जबाबदारी आली. त्यासाठी जगभरातून देणग्या येत होत्या, त्याचा हिशेब ठेवणे आणि तेही अत्यंत पारदर्शक पद्धतीने ठेवणे हे अत्यंत योग्य रीतीने केले. तीन तीन, चार चार महिने बँका पैसे घेत नव्हत्या, इतका पैशाचा ओघ येत होता, पण प्रत्येक गोष्ट तुम्ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि अत्यंत समयबद्ध पद्धतीने करत हे राम मंदिर उभे केले ज्याचे आम्हाला दर्शन मिळाले, त्यात तुमचे विशेष योगदान आहे. तो प्राणप्रतिष्ठापनेचा क्षण मी प्रत्यक्ष पाहत होतो, त्यावेळी तिथे ७-८ हजार लोक होते, सगळी नामवंत आणि यशस्वी माणसे होती. अशा यशस्वी माणसांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता येते. पण ज्या क्षणी आम्हाला प्रभू श्रीरामांचे मुखदर्शन झाले तेव्हा तिथे असा एकही डोळा नव्हता जो पाणवलेला नव्हता. हे त्या रामाचे सामर्थ्य आहे. ५०० वर्षांपूर्वीचा राम परत आला, हे आम्हाला याची देही याची डोळा अनुभवता आले. त्यानंतर स्वामीजी तुम्ही प्रथम भाषणाला उठलात, तेव्हा तुम्ही म्हणालात की, आम्हाला आज असा एक राजा मिळाला आहे जो राजधर्माचे पालन करत आहे. असा राजा मिळाला तरच राष्ट्र पुढे जाते. आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण सांगितली. एक राजा देवासमोर नतमस्तक होतो, हा शिवाजी महाराजांचा आदर्श आजचे पंतप्रधान पाळत आहेत, हे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांना संन्यास घ्यायची इच्छा झाली होती. त्यांना मोक्ष सहज शक्य होता; पण त्यांनी राष्ट्रासाठी स्वतःचा मोक्ष बाजूला ठेवला आणि आपला लढा सुरू ठेवत  आणि राष्ट्रासाठी आपले सर्व जीवन अर्पण केले. स्वामीजींनी आठवण करून दिली की, आपल्याला अशीच माणसे हवीत. आपला राजपुरुष राजधर्माचे पालन करणारा हवा, तो सक्षम असला पाहिजे आणि त्याला ही जाणीव हवी की, धर्माला शस्त्राचा आधार असेल तर धर्म पांगळा होतो आणि शस्त्रावर धर्माचा अंकुश नसेल तर ते शस्त्र पाशवी होते, असेही रणजित सावरकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.