BMC Budget 2023-24: चहलांची निष्ठा शिंदे-फडणवीसांवरच: तब्बल सहा वेळा अर्थसंकल्पात नावाचा उल्लेख

122

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह यांनी मागील अर्थसंकल्पातील भाषणाच्या पुस्तिकेत तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख दोन वेळा तर तत्कालिन पालकमंत्री आदित्य ठाकरे व तत्कालिन महापौर किशोरी पेडणेकर यांचा एक वेळा नावाचा उल्लेख केला  होता, परंतु आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या भाषणात आयुक्त तथा प्रशासक चहल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख तब्बल सहा वेळा केला आहे. त्यामुळे चहल यांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे गोडवे गात त्यांना आपलेसे करण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेचा सन २०२२-२३ चा अर्थसंकल्प मांडताना महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोविड काळातील कामगिरी आणि महापालिकेला केलेल्या सहकार्याबद्दल आपल्या भाषणात आभार मानले होते. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या पुस्तिकेत तत्कालिन मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख चहल यांनी केला होता. परंतु सन २०२३ -२४च्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या पुस्तिकेत पहिल्या पाच पानांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख तब्बल चार वेळा केला आहे.

यावेळेला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्याच्या नावाचा उल्लेख् करणाऱ्या आयुक्त तथा प्रशासकांना मागील सरकारच्या काळातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा कधी उल्लेख करावासा वाटला नव्हता. मागील सरकारच्या काळातील मुख्यमंत्री व उपनगराचे पालकमंत्री यांच्याच नावाचा उल्लेख भाषणात करणाऱ्या चहल यांनी यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या  नावासह उपमुख्यमंत्र्यांचेही नाव जोडून घेतले आहे. विशेष म्हणजे भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार ऍड आशिष शेलार यांनी केलेल्या सुचनांची माहिती देत त्यांच्या  नावाचाही उल्लेख पत्रकार परिषदेत बोलताना केला. त्यामुळे चहल यांनी सरकारमधील मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांचे नाव पदोपदी घेत हा अर्थसंकल्प बनवताना यावर पूर्णपणे सरकारची छाप असल्याचे दाखवून दिले.

( हेही वाचा: BMC Budget 2023-24 Planning: तृतीय पंथीयांना कौशल्य विकास, घरकाम महिलांना व्यावसाय प्रशिक्षणाचा लाभ )

विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प बनवण्यासाठी जनतेकडून तसेच संस्थांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार ९६५ जणांनी अर्थसंकल्पांमध्ये सूचना केल्या असून माजी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासकांना पत्र पाठवून कोणतेही नवीन प्रकल्प हाती घेऊ नये, म्हणून विनंती केली होती, त्यात आदित्य ठाकरे यांच्याकडून एकही सूचना करण्यात आलेली नाही. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील प्रदुषण नियंत्रण व हवेची गुणवत्ता नियंत्रण राखणे, मधुमेही आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी करणे,ओपीडींची संख्या वाढवणे, एमआरआय, सीटीस्कॅनची संख्या वाढवणे, डायलेसीस केंद्र वाढवणे आदी प्रकारचे निर्देश लेखी स्वरुपात दिले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.