Veer Savarkar : ‘मंत्रबळ नव्हे यंत्रबळ’… अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात वीर सावरकरांवरील लेखाचा समावेश

‘मंत्रबळ नव्हे यंत्रबळ’ हा लेख अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यामागे विद्यार्थ्यांना वीर सावरकरांचे विज्ञाननिष्ठ, विवेकवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचार समजावेत, हा शैक्षणिक हेतू असल्याचे मिशनने नमूद केले आहे

6
Veer Savarkar

Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा ‘मंत्रबळ नव्हे यंत्रबळ’ हा वैचारिक लेख आता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. ए. भाग–3च्या मराठी विषयाच्या ‘मायमराठी’ पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना वीर सावरकरांचे विज्ञाननिष्ठ, विवेकवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचार समजावेत, तसेच साहित्याच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चिकित्सक विचार विकसित व्हावा, या शैक्षणिक भूमिकेतून हा लेख अभ्यासक्रमात घेण्यात आल्याची भूमिका, अमरावती मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. काशीनाथ बऱ्हाटे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ‘वीर सावरकर मिशन’चे अध्यक्ष गंधार विश्राम कुलकर्णी यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, त्यांनी डॉ. बऱ्हाटे यांचे आभार मानत, यासंदर्भात एक पत्र देखील पाठवले आहे.

हेही वाचा: Gondhal Movie In Oscars : ‘धुरंधर’ नव्हे, मराठी ‘गोंधळ’ ऑस्कर 2027 साठी भारताची अधिकृत निवड; जाणून घ्या चित्रपटाची नेमकी कथा

केवळ साहित्यिक मूल्य नव्हे, तर विचारांची ओळख

‘मंत्रबळ नव्हे यंत्रबळ’ या लेखाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यामागे केवळ साहित्यिक मूल्यांचा विचार नसल्याचे मराठी अभ्यास मंडळाच्या भूमिकेत स्पष्ट करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांमध्ये बुद्धीप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार आणि विवेकशीलता विकसित करण्याच्या दृष्टीने हा लेख महत्त्वाचा असल्याचे कुलकर्णी यांनी या पत्रात म्हटले आहे. (Veer Savarkar)

वीर सावरकरांच्या विचारविश्वात अंधश्रद्धेपेक्षा बुद्धी, तर्क, प्रयोगशीलता आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाला महत्त्व असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. ‘मंत्रबळ नव्हे यंत्रबळ’ या शीर्षकातूनही या विचारांची दिशा स्पष्ट होते.

समाजाच्या प्रगतीसाठी केवळ रूढ समजुती, कर्मकांड किंवा अदृश्य शक्तींवर अवलंबून न राहता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा स्वीकार करण्याचा विचार या लेखातून अधोरेखित होत असल्याचे, विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाकडून सांगण्यात आले आहे. (Veer Savarkar)

विद्यार्थ्यांनी चिकित्सक पद्धतीने विचार करावा

या लेखाचा अभ्यासक्रमातील समावेश विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंपरा आणि श्रद्धांचा अंधानुकरणाने स्वीकार न करता त्यांची चिकित्सक तपासणी करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, अशी या अभ्यासक्रमामागची मुख्य भूमिका आहे.

कोणत्याही विधानाकडे केवळ स्वीकाराच्या भूमिकेतून न पाहता ते तर्काच्या कसोटीवर तपासणे, उपलब्ध ज्ञानाच्या आधारे निष्कर्ष काढणे आणि स्वतंत्रपणे विचार करणे, ही आधुनिक शिक्षणातील महत्त्वाची उद्दिष्टे असल्याचे बोऱ्हाटे यांनी स्पष्ट केले आहे. (Veer Savarkar)

हेही वाचा: IIT Bombay Student Suicide : विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाला नवं वळण! प्राध्यापकावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप, सत्य काय?

विज्ञानदृष्टी आणि तर्कशुद्ध चिंतनावर भर

डॉ. बऱ्हाटे यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार, या महत्वाच्या समावेशामुळे साहित्याच्या अभ्यासाची व्याप्ती केवळ साहित्यिक मूल्यांपुरती मर्यादित राहणान नसून; विद्यार्थ्यांना विविध विचारप्रवाह, सामाजिक प्रश्न, विज्ञानदृष्टी आणि तर्कशुद्ध चिंतनाची ओळख करून देण्यावर भर दिला जात आहे. (Veer Savarkar)

म्हणजेच, एखाद्या साहित्यकृतीचा अभ्यास करताना तिच्यातील भाषा, आशय आणि साहित्यिक वैशिष्ट्यांसोबतच त्यामागील विचार समजून घेणे, त्यावर प्रश्न उपस्थित करणे आणि स्वतःची भूमिका तयार करणे, हा दृष्टिकोन या पाठाच्या समावेशातून अधोरेखित होत असल्याचे डॉ. बऱ्हाटे यांनी म्हटले आहे.

वीर सावरकर मिशनकडून आभार

या निर्णयाबद्दल ‘वीर सावरकर मिशन’चे अध्यक्ष गंधार विश्राम कुलकर्णी यांनी डॉ. काशीनाथ बऱ्हाटे यांचे आभार मानले आहेत. मिशनकडून पाठवण्यात आलेल्या पत्रामध्ये, मराठी भाषा आणि साहित्य तसेच कोरकू बोली आणि भाषाविज्ञानाच्या अभ्यासक्षेत्रातील त्यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये भाषिक आणि साहित्यीक जाणिवा विकसित करण्यासाठी केलेल्या कार्याचेही पत्रातून कौतुक करण्यात आले आहे. (Veer Savarkar)

शिक्षणातून विचार आणि विवेकाची नवी दृष्टी

मिशनने पाठवलेल्या पत्रातील उल्लेखानुसार, साहित्याचा अभ्यास केवळ साहित्यिक मूल्यांपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना विविध विचारप्रवाह, सामाजिक प्रश्न, विज्ञानदृष्टी आणि तर्कशुद्ध चिंतनाची ओळख करून देणारा असावा, अशी भूमिका या निर्णयातून अधोरेखित होते.

विद्यार्थ्यांना ज्ञान, विचार आणि विवेकाची नवी दृष्टी मिळावी, अशी अपेक्षाही पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. मराठी भाषा, साहित्य, कोरकू बोली, भाषाविज्ञान आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील डॉ. बऱ्हाटे यांचे कार्य पुढेही व्यापक होत राहावे, अशा शुभेच्छा मिशनने दिल्या आहेत. (Veer Savarkar)

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.