Yogi Adityanath : उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भविष्यातील राष्ट्रीय भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. त्यातच योगी आदित्यनाथ यांनी ‘द स्टेट्समॅन’ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानपदाच्या दावेदारीपासून ते अयोध्या, काशी-मथुरेच्या विकासापर्यंत विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली आहे.
पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ काय म्हणाले?
२०२७ नंतर पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून स्वतःकडे पाहता का, असा प्रश्न विचारला असता योगी यांनी उत्तर प्रदेशच्या विकासावरच आपले लक्ष असल्याचे स्पष्ट केले. “राष्ट्र प्रथम हे माझे मार्गदर्शक तत्त्व आहे. पक्षाने उत्तर प्रदेशातील जनतेची सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. राज्याला आर्थिक, सामाजिक आणि सुशासनाच्या मॉडेलवर पुढे नेणे हेच माझे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.
अयोध्या-काशी-मथुरेच्या विकासावरून टीकेला उत्तर
अयोध्या, काशी आणि मथुरेच्या विकासामुळे शिक्षण-आरोग्यासारख्या मूलभूत मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी धार्मिक वारसा आणि विकास हे परस्परविरोधी नसल्याचे सांगितले. काशी विश्वनाथ धामच्या विकासानंतर काशीमध्ये २५ कोटींहून अधिक भाविक आले असून, सुमारे १.२५ लाख कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाल्याचा दावा त्यांनी केला. याचा फायदा स्थानिक व्यावसायिकांना झाल्याचेही त्यांनी नमूद केले. अयोध्या आणि प्रयागराजमध्येही धार्मिक पर्यटनामुळे आर्थिक हालचाली वाढल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राकडेही सरकारचे लक्ष असल्याचे सांगताना योगी यांनी एन्सेफलायटिसवर नियंत्रण मिळवल्याचा आणि राज्यात ८० वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत असल्याचा दावा केला.
‘लाभार्थ्यांना जात नसते’
दरम्यान, २०२७ च्या निवडणुकीतील जातीय समीकरणांबाबत बोलताना योगी यांनी निवडणुका केवळ जातीच्या गणितावर ठरत नसल्याचे म्हटले. प्रतिनिधित्व, स्थानिक प्रश्न, उमेदवार आणि सुशासनासोबतच नागरिकांना सरकारकडून मिळणारा प्रत्यक्ष अनुभव महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. २०१७ आणि २०२२ मध्ये ओबीसी व दलित समाजाने सरकारला साथ दिल्याचा दावा करत त्यांनी, “लाभार्थ्यांना जात नसते. लाभार्थी हा जातीपलीकडचा वर्ग आहे. तेच आमचे गणित आणि रसायन दोन्ही आहे,” असे म्हटले.
हेही पाहा –


