- कल्याण : प्रतिनिधी
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या कल्याण रेल्वे स्टेशन (Kalyan Station) परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न ऐरणीवर आला आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडे असलेल्या परिसरात तृतीयपंथीयांच्या दोन टोळक्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात एकाला लक्ष करून त्याला नग्न तर केलेच शिवाय बेदम झोडपून काढले. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे.
या व्हिडिओमध्ये तृतीयपंथीयांच्या दोन टोळक्यांमध्ये आधी वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. त्यानंतर टोळक्याने एकाला पकडून मारहाण करत त्याचे कपडे फाडण्यात आल्याचे व्हायरल झालेला व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. घटना घडली त्यावेळी स्टेशन परिसरात हजारो प्रवासी ये-जा करत होते. अचानक सुरू झालेल्या तृतीयपंथीयांच्या टोळक्यातील राड्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. महिलांसह लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या प्रकारामुळे भयभीत झाले होते. उघड्या जागेत अशा प्रकारे कपडे काढून मारहाण होत असताना कुणीही हस्तक्षेप करण्याचे धाडस केले नाही.
(हेही वाचा – Ambulance Tracking System : राज्यातील प्रत्येक रुग्णवाहिकेवर राहणार डिजिटल नजर; आपत्कालीन सेवेत होणार मोठे बदल)
कल्याण स्टेशन (Kalyan Station) परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वसुली, वाद आणि हाणामारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. स्टेशन परिसरात तृतीयपंथीयांकडून पादचाऱ्यांसह प्रवाशांना त्रास दिल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने कल्याणकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. लाखो प्रवासी दररोज या स्थानकातून प्रवास करतात, मग स्टेशन परिसर राडा मुक्त होणार कधी ? असा थेट सवाल आता कल्याणकर विचारत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओची (Viral video) माहिती मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत वादात सहभागी असले सर्वजण तेथून पसार झाले होते. सध्या पोलिस व्हिडिओच्या आधारे संबंधितांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. या घटनेनंतर स्टेशन परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे, पोलिसांची २४ तास गस्त आणि तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याची प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. महिलांसह लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्टेशन परिसरात तातडीने कठोर पावले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कल्याण जंक्शनच्या प्रतिमेला धक्का बसला असून प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कायदा-सुव्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
हेही पहा –


