अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा मृतदेह खोलीत लटकलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेमुळे हलकल्लोळ माजला आहे. प्रयागराजच्या बाघमबरी मठामध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
मठात प्रवेश बंदी!
महंत गिरी महाराज यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांची खोली आतून बंद होती. जेव्हा महंत यांची खोली बराच काळ बंद होती म्हणून ती खोली उघडण्यात आली, त्यावेळी महंत गिरी महाराज यांचा मृतदेह हा खांब्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. महंत गिरी हे मागील अनेक दिवसांपासून तणावात होते. मात्र प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी महंत यांची हत्या झाली, असे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान सध्या कुणालाही मठात प्रवेश दिला जात नाही. सध्या या प्रकरणाचा तपास फॉरेन्सिक टीम करीत आहे. मात्र महंतांच्या मृत्यूनंतर आखाडा परिषदेतील अंतर्गत मतभेदाच्या बातम्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. दरम्यान आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अयोध्येत शोककळा पसरली आहे.
(हेही वाचा : राज्य अराजकतेकडे… शेलारांचा ठाकरे सरकारवर आरोप)
कोरोनातही कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी आग्रह
दरम्यान मार्च २०२१ पासून उत्तराखंड येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज आग्रही होते. आयोजनात प्रतिबंध आणले जात होते, मात्र त्याला महंतांनी विरोध केला होता.
‘या’ वादामुळे होते चर्चेत!
निरंजनी आखाड्याचे निलंबित योग गुरु आनंद गिरी आणि आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्यात मठ-मंदिरांच्या जमिनीवरून बराच वाद निर्माण झाला होता. त्यातून ते चर्चेत आले होते. स्वामी आनंद गिरी यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांना पत्र लिहून त्यांना आखाड्यातील वादासंबंधी माहिती दिली. त्यांनी आरोप लावले की, शहरातील कीडगंजस्थित गोपाळ मंदिर हे अर्धे विकण्यात आले होते. मठ आणि मंदिर यांच्या विकलेल्या जमिनीच्या कोट्यवधी रुपयांचा दुरुपयोग करण्यात आला, त्यांची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. त्याच बरोबर त्यांनी संगमस्थित बडे हनुमान मंदिराला अर्पण केलेल्या लाखो रुपये देणगीचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. हा वाद अनेक दिवसांपासून सुरु होता. मात्र आनंद गिरी महाराज यांनी माफी मागून वाद संपवला होता.
Join Our WhatsApp Community