क्रिकेटमध्ये नवीन फाॅर्मेट येणार आहे का? वनडे क्रिकेटमध्ये बदल होणार आहे का? आता वनडे सामने 40 ओव्हरचे होणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे सध्या शक्य नाही. पण बदलांची चर्चा सुरु झाली आहे. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मते, वनडे फाॅर्मेटला जिवंत ठेवण्यासाठी त्यात बदल आवश्यक आहेत. वनडे क्रिकेटमध्ये 40 ओव्हर्सचे सामने खेळवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. त्यांच्या या मताचे दिनेश कार्तिकनेसुद्धा समर्थन केले आहे.
वनडे क्रिकेट आता तेवढे आकर्षक राहिलेले नाही. त्याचे महत्त्व कमी होत आहे. यावर्षी भारतात होणारा 50 ओव्हर्सचा वर्ल्ड कप शेवटचा वर्ल्ड कप ठरु शकतो. रवी शास्त्री आणि दिनेश कार्तिक असे का बोलत आहेत, ते जाणून घेऊया.
काय म्हणाले रवी शास्त्री?
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, वनडे क्रिकेट वाचवण्यासाठी भविष्यात ओव्हर कमी करुन 40-40 ओव्हर्सचे सामने खेळावेत. 1883 साली आम्ही वर्ल्ड कप जिंकला, त्यावेळी 60 ओव्हर्सच्या मॅचेस होत्या. लोकांचा रस कमी होऊ लागल्यानंतर 50 ओव्हर्सचा खेळ झाला. मला वाटते आता, 40 ओव्हर्सचे सामने खेळवण्याची वेळ आली आहे. वेळेबरोबर बदल गरजेचा आहे, असे रवी शास्त्री यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: राज्यात उष्णतेची लाट; उष्माघातापासून वाचण्यासाठी ‘हे’ करा, ‘हे’ करु नका, जाणून घ्या सविस्तर )
लोकांना 7 तास थांबून मॅच पाहायची इच्छा नाही?
दिनेश कार्तिकने रवी शास्त्रींचे समर्थन केले. लोकांना टेस्ट क्रिकेट पाहायचे आहे. तो क्रिकेटचा उत्तम फाॅर्मेट आहे.
टी-20 क्रिकेट लोक मनोरंजनासाठी पाहतात. पण 50 ओव्हर्सचा खेळ बोरिंग व्हायला लागला आहे. लोकांना 7 तास थांबून सामना पाहण्याची इच्छा राहिली नाही, असे दिनेश कार्तिक म्हणाला.
त्यामुळे कार्तिकलाही वाटत आहे की, भारतात होणारा 50 ओव्हर्सचा वनडे वर्ल्ड कप शेवटचा ठरेल. रवी शास्त्री आणि दिनेश कार्तिक यांचे हे म्हणणे कितपत योग्य आहे आणि ICC याबद्दल काय विचार करते हे लवकरच समजणार आहे.