वीर सावरकरांच्या विचारांचे विस्मरण झाल्याने स्वातंत्र्यानंतर गंभीर परिणाम भोगावे लागले – रणजित सावरकर

132

वीर सावरकर यांनी राष्ट्राविषयक जे जे विचार मांडले, त्याचे विस्मरण झाले म्हणून त्याचे गंभीर परिणाम आपण स्वातंत्र्यानंतर आजही भोगत आहोत. काश्मीरमधील बराचसा भूभाग आपण गमावला, हजारो जवानांचे प्राण गमावले. १९४८ मध्ये आपल्याला नुकसान सहन करावे लागले. १९६१चे चीनसोबतचे युद्ध आपण हरलो, १९७१च्या लढाईला सामोरे जावे लागले, हे सगळे आपण विसरत गेलो, असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर म्हणाले की, २०१४ साली देशात जे सरकार आले ते वीर सावरकर यांच्या विचारांवर चालत आहे, त्यामुळे आता बदल घडताना दिसत आहेत. पहिल्यांदा भारतीय जवानांनी चिनी सैन्यांना गलवान घाटीत धडा शिकवला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार, तसेच शिखर सावरकर पुरस्कार दिले जातात. रविवार, २२ मे २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झाला. यावेळी रणजित सावरकर बोलत होते. वीर सावरकर यांनी मांडलेले विचार जे आपण विसरत चाललो आहोत, ते वारंवार स्मरणात आणून देण्याचे कार्य सावरकर स्मारक करत आहे. वीर सावरकर कायम म्हणायचे की, देशाची सीमा कागदावर नाही, तर बंदुकीच्या टोकाने जमिनीवर रेखाटली जाते, हे विचार आपण विसरलो, म्हणून स्वातंत्र्यानंतर आपण हजारो जवानांचे प्राण गमावले, असे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर म्हणाले.

वीर सावरकर यांच्या विचारांची प्रेरणा

आपण मुघलांसमवेत हरलो, कारण आपल्यापेक्षा मुघलांची तलवार लांब होती. म्हणून वीर सावरकर हे ‘स्वतःला सशक्त करण्यासाठी विज्ञानाची मदत घेऊन युद्धसज्ज राहावे’, असे सांगायचे. आपण आजही या विचाराचा पुरस्कार केला पाहिजे, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून सावरकर विज्ञान पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार यंदा ब्रह्मोस एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल दिनकर राणे यांना देण्यात आला. आपल्याकडे शस्त्र आहे, सैन्य आहे पण आपल्यात २०१४ च्या आधी आत्मविश्वास नव्हता, पण त्यात बदल झाला आहे. जोवर हिंदू संघटन होणार नाही, तोवर या देशात हिंदूंचे अस्तित्व टिकून राहणार नाही. हिंदू विविध जाती प्रांतात विभागाला आहे, त्यामुळे कोणतेही सरकार आपल्याकडे गांभीर्याने पाहत नाही. म्हणून वीर सावरकर यांच्या विचारांनुसार हिंदूंना संघटीत करण्याचे कार्य करणाऱ्या संघटनांचा सन्मान केला जातो, या पुरस्कारासाठी वडोदरा येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक केंद्रा’ची निवड करण्यात आली आहे. सावरकर यांच्या मार्सेलिस उडीने त्यांच्या साहसासोबतच देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला होता. या साहसाच्या प्रेरणेतून स्मारकाच्या वतीने शिखर सावरकर पुरस्कार देण्यात येतो, अशा शब्दांत रणजित सावरकर यांनी पुरस्कारांमागील वीर सावरकर यांच्या विचारांची प्रेरणा स्पष्ट केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.