राहुल गांधींना कॉंग्रेसचा बेडूक करायचा आहे! पण या खेळात जीव बेडकाचा जातो

108

कॉंग्रेसच्या मनातील अध्यक्ष राहुल गांधी हे आपणच बनवलेल्या जगात वावरत असतात की काय असा प्रश्न कधीकधी पडतो. म्हणजे निवडणूक तोंडावर असताना हा माणूस भारत जोडो यात्रा काढतोय. गुजरातची निवडणूक किती महत्वाची आहे हे राहुल गांधी यांना माहिती नाही काय? गेल्या वेळी कॉंग्रेसचा पराभव झाला तेव्हा त्यास राहुल गांधींचा नैतिक विजय झाला असं म्हटलं गेलं.

सतत होणारा पराभव, याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचं अध्यक्षपद नाकारलं. परंतु कॉंग्रेसचा सगळा गोतावळा घेऊन राहुल गांधी भारत जोडो यात्रेत हिंडत आहेत. मग मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्ष होण्याला काय अर्थ प्राप्त होतो? कॉंग्रेस मानसिकदृष्ट्या गांधी कुटुंबाला शरण गेली आहे. त्यामुळे अध्यक्ष कागदावर बदलला तरी गांधी कुटुंबाच्याच हातात सत्ता आहे.

(हेही वाचाः ‘लग्नानंतर मुलीला घरातली कामं सांगणं म्हणजे…’, न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी)

राजकारण हा काँग्रेसच्या युवराजांचा खेळ

आता राहुल गांधी हे कॉंग्रेसचे युवराज आहेत. त्यांचा बालहट्ट पुरवणे हे कॉंग्रेसच्या लोकांचं परम कर्तव्य आहे. म्हणून गेली अनेक वर्षे या युवराजांना प्रमोट करण्यात कॉंग्रेस मशगूल आहे. आता राहुल गांधींची समस्य अशी आहे की त्यांना राजकारणातलं काहीच कळत नाही. ते गंमत किंवा विरंगुळा म्हणून राजकारण करतात. म्हणजे विरंगुळा म्हणून आपण जसा एखादा चित्रपट पाहतो, तसे राहुल गांधी राजकारण करतात. राजकारण हा या युवराजांचा खेळ आहे.

मुलांचा खेळ होतो पण बेडकाचा जीव जातो

आपल्या सर्वांना मुलांची आणि बेडकाची गोष्ट माहिती आहे. मुलं बेडकासोबत खेळतात. त्या खेळात बेडकाचे हालहाल होतात, मुलांना मज्जा येते. म्हणजे मुलांचा खेळ होतो पण बेडकाचा जीव जातो. तसंच काँग्रेसचे युवराज कॉंग्रेससोबत करत आहेत. महत्वाची निवडणूक सोडून राहुल बाबा भारत जोडो यात्रेला लागले आहेत. काँग्रेस कशी वाढेल? मोदींचा पराभव कसा करता येईल याची कोणतीही योजना राहुल बाबाकडे नाही. राहुल बाबाला केवळ राजकारण-राजकारण खेळायचं आहे. पण या खेळात कॉंग्रेस संपत आहे, हे राहुल बाबाच्या लक्षात येत नाही आणि कॉंग्रेसलाही कळत नाही की ज्याला आपण आपला युवराज मानतो, त्याची पात्रता साधा खासदार होण्याचीही नाही.

(हेही वाचाः ‘सोशल मीडियावर चुकीची पोस्ट केली तर…’, सरकारने जारी केले नवे IT नियम)

म्हणूनच आता गुजरातमध्ये आम आदमी पार्टी आपले पाय रोवत आहे. भविष्यात गुजरातमध्ये आप कॉंग्रेसची जागा घेईल. मग विरंगुळा म्हणून युवराज राहुल बाबा दांडी यात्रा काढतील आणि हा खेळ असाच सुरु राहील…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.