एसआरपीएफ जवानांच्या बदलीचा कालावधी बदलला!

एसआरपीएफ जवानांसाठी घेतलेल्या या दिलासादायक निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

81

राज्य राखीव पोलिस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत १२ मे रोजी मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या जवानांच्या जिल्हा पोलिस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट १५ वर्षांवरुन १२ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा पोलिस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलिस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी ५ वर्षांवरुन २ वर्षांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसआरपीएफ जवानांसाठी घेतलेल्या या दिलासादायक निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

(हेही वाचाः मुंबई पोलिस दलातील ३७० पोलिस सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर!)

आदित्य ठाकरेंनी केला पाठपुरावा

या निर्णयासाठी आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीवरुन एसआरपीएफ जवानांच्या या प्रश्नाबाबत समितीही गठीत करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार, १२ मे रोजी झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांचे मनोबल उंचावणार असून, अधिक कार्यक्षमतेने कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

(हेही वाचाः आता कोरोना रुग्णांचे प्राण वाचवणार पोलिस दलातील ‘सुपर सेव्हर्स’!)

या निर्णयाबद्दल मंत्री ठाकरे यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक संजय पांडे, अतिरिक्त पोलिस महासंचालक अर्चना त्यागी यांचेही आभार मानले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.