नवनीत राणांना पोलिसांवरील आरोप भोवणार! पोलीस आता एक्शन मोडमध्ये

115

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्याना हाय व्होल्टेज ड्रामानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. त्यावेळी एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले, तेव्हा नवनीत राणा यांनी त्या मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना पाणी दिले नाही, बाथरूम वापरण्यास दिले नाही, असा गंभीर आरोप केला. त्यानंतर मात्र पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्याला पोलीस ठाण्यात चहा-बिस्किटे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यामुळे राणा यांच्या आरोपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आता पोलीस स्वतः खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहेत.

पोलिसांवरील जात्यंधतेच्या आरोपावरून वादळ 

नवनीत राणा यांनी या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली. अध्यक्षांनी या प्रकरणी अहवाल मागितला. या प्रकरणाचे गांभीर्य वाढल्याबाबरोबर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी लगेचच व्हिडिओ व्हायरल केला, त्यामध्ये राणा दाम्पत्याना पोलीस चहा आणि बिस्कीट देऊन त्यांचा पाहुणचार केला, असे सांगत नवनीत राणांचा आरोप खोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता पोलिसांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी राणा यांच्याविरोधात तक्रार दाखल होऊ शकते. तशी तयारी पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. त्यांना खार पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. त्यावेळचा व्हिडीओ पांडेंनी शेअर केला आहे. त्यात राणा दाम्पत्य चहा पिताना दिसत आहे. आम्ही अधिक काही बोलायची गरज आहे का? असे पांडेंनी ट्विटसोबत म्हटले आहे. त्यामुळे राणा यांनी पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपांमध्ये किती तथ्य आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी खार पोलिसांनी त्यांच्याशी जात्यंध वर्तन केल्याचा आरोप केला, तर राणांच्या वकिलाने मात्र हे वर्तन वांद्रे पोलिसांनी केल्याचा आरोप केला, या आरोपांमध्येही अस्पष्टता असल्याने आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

(हेही वाचा थकीत रक्कम मिळण्याआधीच ७३ सेवानिवृत्त एसटी कर्मचारी, अधिका-यांचा मृत्यू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.