Nirmala Navle has been appointed as the new president of NCP Youth Congress.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती आघाडीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा संघटनात्मक बदल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला शुभम नवले (Nirmala Navle) यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी (NCP Youth Congress State President) अधिकृतपणे निवड झाली आहे. पक्षसंघटन अधिक बळकट करणे आणि राज्यातील तरुणींना पक्षाशी जोडून घेणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. (Nirmala Navle)
निर्मला नवले यांनी शिरूर तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे कारेगावच्या सरपंच म्हणून काम केले. ग्रामीण भागातील महिला आणि तरुणांना संघटित करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या नियुक्तीमुळे राज्यातील युवती संघटना अधिक मजबूत होईल आणि तरुणींच्या विविध प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
कोण आहेत निर्मला नवले?
निर्मला शुभम नवले यांनी २०२१ मध्ये अवघ्या २७ व्या वर्षी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. त्या आयटी शाखेतील बी.ई. (IT) पदवीधर आहेत. नवले यांनी कारेगावच्या सरपंचपदापासून राजकीय प्रवासाची सुरुवात केली.
कार्याध्यक्षपदापासून प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी निर्मला नवले यांच्यावर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्या पदावर काम करताना त्यांनी राज्यभरातील युवतींशी संवाद साधत संघटन विस्तारासाठी काम केले. गुरुवारी ५ ऑगस्टला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली. आता महाराष्ट्रातील युवतींचे संघटन अधिक सक्षम करणे, नव्या महिला नेतृत्वाला संधी उपलब्ध करून देणे आणि पक्षाची ताकद वाढवण्याची जबाबदारी असेल.
या मुद्द्यांवर राहणार विशेष भर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर निर्मला नवले यांनी शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षितता, सायबर छळाविरोधातील जनजागृती, आरोग्य, स्वावलंबन आणि तरुणींचे राजकीय प्रतिनिधित्व या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तसेच सुशिक्षित आणि कर्तृत्ववान युवतींना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या प्रश्नांसाठी प्रभावी व्यासपीठ उभे करण्याचे ध्येय त्यांनी व्यक्त केले आहे.