Lok Sabha Election : शिवसेना असली-नकली ठरवणारी निवडणूक, मुख्यमंत्री शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई

101
Lok Sabha Election : शिवसेना असली-नकली ठरवणारी निवडणूक, मुख्यमंत्री शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई
Lok Sabha Election : शिवसेना असली-नकली ठरवणारी निवडणूक, मुख्यमंत्री शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई
  • सुजित महामुलकर

लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election) खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई असेल. या निवडणुकीत शिवसेना ‘असली-नकली’चा फैसला होईल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला महायुतीमध्ये जेमतेम ७-९ जागा देऊन बोळवण केली जाईल असा कयास लावला जात होता. मात्र सगळे राजकीय आडाखे चुकीचे ठरवत शिंदे यांनी अपेक्षेपेक्षा अधिक, तब्बल १५ जागांवर शिवसेनेचे उमेदवार उभे करून उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध एक लढाई जिंकली आहे. दुसऱ्या लढाईचा निकाल ४ जूनला लागेल.

सिद्ध करून दाखवावेच लागेल!

एकनाथ शिंदे यांची खरी परीक्षा आता सुरू झाली आहे. त्यांच्यासाठी ही निवडणूक आर-पारची लढाई असेल. आता शिवसेना उबाठा गटापेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे, अन्यथा त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जरी ‘उबाठा’ला नकली शिवसेना म्हणून संबोधले असले तरी शिंदे यांची शिवसेनाच ‘असली’ आहे, हे शिंदे यांना सिद्ध करून दाखवावेच लागेल. (Lok Sabha Election)

(हेही वाचा – Temple : श्री देव बोडगेश्वर मंदिरातील चोरी प्रकरणी एका बांगलादेशीसह ६ मुसलमानांची टोळी पोलिसांच्या ताब्यात)

विलंब करून दबाव

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जागावाटापाबाबत महायुतीची म्हणजेच भाजपा-शिवसेना (शिंदे)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची चर्चा सुरू असताना शिंदे यांनी काही जागांबाबत निर्णय घेण्यास विलंब करून अप्रत्यक्षरित्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव आणला होता. ही खेळी मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पश्चिम, ठाणे, नाशिक अशा काही जागांवर यशस्वी झाल्याचे आता दिसून येत आहे. नाशिकचे राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार छगन भुजबळ यांनी निर्णय होत नाही, असे दिसत असताना, अखेर कंटाळून स्पर्धेतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. भुजबळ यांना निवडून येण्याची अजिबात खात्री नव्हती हा भाग वेगळा. याचे कारण त्यांनी मराठा आंदोलनावेळी घेतलेली मराठाविरोधी भूमिका. त्याचप्रमाणे त्यांना दिल्लीपेक्षा राज्याच्या राजकारणात अधिक रस असून लोकसभेसाठी त्यांचा आग्रह हा त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्यासाठी होता. मात्र भाजपा त्यासाठी अजिबात तयार नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्वतः स्पष्ट केले. मुंबईतील सहापैकी तीन जागा भाजपाच्या ‘घशा’तून काढून घेणे ही देखील मोठं कसब होती. (Lok Sabha Election)

…तर प्रचारावर परिणाम झाला असता!

शिंदे खरंच बलाढ्य अशा भाजपावर दबाव आणू शकतात का? असा प्रश्न सर्वसाधारणपणे पडू शकतो. भाजपाने शिंदे यांना डावलून जागांबाबत निर्णय घेतला असता तर शिंदे यांच्याकडून निवडणूक प्रचारातील सहभाग कमी होण्याची दाट शक्यता होती. तसेच शिंदे यांची नाराजी कार्यकर्त्यांपासून लपून राहिली नसती. त्याचा परिणाम सगळ्याच मतदारसंघातील कार्यकर्त्यांवर झाला असता, जे भाजपाला परवडणारे नव्हते. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांचा प्रचारातील सहभाग किती महत्त्वाचा आहे याची कल्पना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना असल्याने, विश्वास बसत नसला तरी भाजपावर या दबावतंत्राचा परिणाम झाल्याचे जागावाटपातून स्पष्ट दिसून येत आहे.

(हेही वाचा – Hospital : कडक नियमांचा फटका; पुण्यातील 35 रुग्णालयांना लागले टाळे)

ठाकरे-शिंदेंसाठी धर्मयुद्ध

शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर मुंबईसह राज्यातील १३ खासदारांनी शिंदे यांना साथ देत उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला. सर्वच विद्यमान खासदारांना उमेदवारी देता आली नसली तरी १२ पैकी सात खासदारांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवण्यात त्यांना यश आले. महायुतीतील शिंदे यांचे १५ आणि महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा गटाचे २१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून बहुतांश ठिकाणी एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी थेट लढत होणार आहे. या धर्मयुद्धात कुणाचे उमेदवार अधिक निवडून येतात यावर जनतेचा कौल कुणाला आहे, या कोड्याचे उत्तर मिळेल. उद्धव ठाकरे जनतेच्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होतात की शिंदे यांच्या भूमिकेवर जनतेने अधिक विश्वास दाखवला? याबाबतचे चित्रही स्पष्ट होईल. (Lok Sabha Election)

मोदींची प्रतिष्ठा शिंदे राखतील?

गेल्या दोन (२०१४ आणि २०१९) लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपा युती होती. या दोन्ही निवडणुकीत मोदी लाट स्पष्टपणे दिसून येत होती. शिवसेनेने मोदी यांच्या नावाने मते मागितली हे कुणीही नाकारू शकत नाही मात्र आताच्या शिवसेना उबाठाने हा दावा खोडून काढत केवळ बाळासाहेबांच्या नावावर जनतेने १८ (दोन्ही निवडणुकीत) खासदार लोकसभेत (Lok Sabha Election) पाठवले, असा प्रचार केला. यंदा प्रथमच ठाकरे भाजपाशिवाय (कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासोबत) निवडणुकीला सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीत ठाकरे यांच्यावर २१ पैकी किमान १८ उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान असणार आहे. तर शिंदे यांनाही १५ पैकी किमान १३ उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करावे लागणार आहे. तरच शिंदे यांनी मोदी यांची प्रतिष्ठा राखली असा अर्थ निघू शकेल आणि ठाकरे यांनी १८ जागा राखल्या तर मागच्या दोन्ही निवडणुकीत स्व-बळावर १८ जागा जिंकल्या होत्या हे सिद्ध होईल.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: सुप्रिया सुळे आणि आमदार संग्राम थोपटेंवर Ajit Pawar यांचा हल्लाबोल)

भाजपाचीही प्रतिष्ठा पणाला…

ही लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जशी शिंदे-ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे तशीच मोदी आणि भाजपा यांच्यासाठीही तितकीच प्रतिष्ठेची आहे. शिंदे यांचे कमी उमेदवार निवडून आले तर मोदी लाट ओसरत आहे, असा अर्थ विरोधकांकडून काढला जाऊ शकतो आणि त्याचा परिणाम सहा महिन्यांनी होऊ घातलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीवर किती होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.