शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही दिवसांपूर्वी टीका केली होती. फडणवीसांचं 1857च्या युद्धातही योगदान होतं, असा टोला ठाकरे यांनी लगावला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. मी जर त्यावेळी असेन तर मी नक्कीच तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने लढलो असेन, तुम्ही तेव्हाही इंग्रजांशीच युती केली असेल, अशा शब्दांत फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
आम्हाला अभिमान आहे
सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहेत, त्यांना ना कधी संघर्ष करावा लागला ना कधी त्यांनी तो पाहिला. त्यामुळे कारसेवकांनी केलेल्या कार्याची ते थट्टा करू शकतात. पण माझ्यासारख्या लाखो कारसेवकांना गर्व आहे. ज्यावेळी बाबरी ढाचा पाडला गेला त्यावेळी मी तिथे होतो.
(हेही वाचाः राज ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा का नाही? जलील ओततायत आगीत तेल)
तुम्ही आता ज्यांच्याशी युती केली आहे ते…
मी हिंदू आहे, माझा मागील जन्मावरही विश्वास आहे पुनर्जन्मातही विश्वास आहे. त्यामुळे कदाचित मागच्या जन्मी मी असेन तर तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत मी लढलो असेन. तुम्ही त्यावेळी सुद्धा इंग्रजांशीच युती केली असेल. कारण आता तुम्ही ज्यांच्याशी युती केली आहे ते 1857 ला स्वातंत्र्ययुद्ध नाही तर शिपायांचं बंड मानतात, अशा शब्दांत फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
फडणवीसांचं 1857 च्या युद्धातही मोठं योगदान आहे. पण या वादामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आता अयोध्येत राम मंदिर निर्माण होत आहे. पण त्याही पुढे महाराष्ट्र आणि देशासमोर बेरोजगारी महागाई सारखे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. पण एकीकडे महाविकास आघाडी सरकार विकासाची कामं करत असताना विरोधकांकडून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः राज ठाकरे हिंदीत बोलले आणि सर्व हसायला लागले)
Join Our WhatsApp Community