सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा बुधवारी दुसरा दिवस आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत शिंदे गटाकडून वकिल हरिश साळवे, नीरज किशन कौल, मनिंदर सिंह आणि महेश जेठमलानी यांचे युक्तिवाद पूर्ण झाले. आता तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडत आहेत.
अॅड. तुषार मेहता यांचा युक्तिवाद काय
- राज्यपालांतर्फे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी युक्तिवाद सुरु केला आहे. त्यांनी आपण सात मुद्दे मांडणार असल्याचे सांगितले. त्यावर घटनापीठाने केवळ राज्यपालांची बाजू मांडण्याचे सांगितले.
- तुषार मेहता म्हणाले, ठाकरे गटाने दावा केला आहे की, सरकार स्थापन होण्यापूर्वीच राज्यपालांना बहुमत चाचणीचा आदेश देण्याचा अधिकार असतो. दुसरा मुद्दा असा मांडला आहे की, राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश देण्यापूर्वी ठाकरे गटाची बाजू ऐकली नाही. किंवा आधी विरोधकांनाच अविश्वास प्रस्ताव मांडण्यास सांगायला हवा होता.
- विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यात फरक असतो. शिवसेना विधिमंडळ पक्षानेच एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळेच शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्यानंतर राज्यपालांनी प्रथम एकनाथ शिंदेंना बोलावले.
( हेही वाचा: तुम्ही मुके घेतले तुम्ही निस्तरा; आमच्या शिवसैनिकांना का अटक केलीत? राऊतांचा सवाल )
- बंडखोर 38 आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे राज्यपालांना सांगितले होते. 7 अपक्ष आमदारांनीही जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले.
- तसेच, राज्यपालांनी सरकारला बंडखोर आमदारांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले होते. यावेळी संजय राऊत यांनी धमकी दिली होती, असेही तुषार मेहता यांनी युक्तिवादादरम्यान सांगितले.