
-
प्रतिनिधी
Operation Tiger महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ या शब्दाने जबरदस्त खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना उबाठाचे ८ खासदार फुटणार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची गुप्त भेट घेतली, अशा चर्चांनी गेले दोन दिवस राजकारण तापले होते. मात्र, या सर्व वावड्यांवर आता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत कडक शब्दांत स्पष्टीकरण देत या प्रकरणावर पडदा टाकला आहे. गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या अफवांच्या मालिकेतील हा एक भाग असल्याचे सांगत त्यांनी सर्व दावे फेटाळून लावले आहेत. (Operation Tiger)
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी झालेल्या दौऱ्यापासून झाली. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे दरे येथे गेले असतानाच, शिवसेना उबाठातील ८ खासदारांसोबत त्यांची ठाण्यात गुप्त बैठक झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यात प्रामुख्याने अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे यांच्यासह ८ बड्या नावांची चर्चा सुरू होती. ही चर्चा इतकी टोकाला गेली की, खासदार अरविंद सावंत यांनी चक्क लेखी पत्र लिहून आपली निष्ठा जाहीर केली आणि या बातम्यांना ‘घाणेरडे राजकारण’ संबोधले. (Operation Tiger)
(हेही वाचा – Mumbai Crime : स्वस्त सोन्याच्या नादात सराफ व्यावसायिकाला १५ लाखांचा गंडा; बनावट पोलिसांनी फिल्मी स्टाईलने लुटले)
दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनीही या बातम्या निराधार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. मात्र, चर्चा थांबण्याचे नाव घेत नसल्याने अखेर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच समोर यावे लागले. “शिवसेना उबाठातील खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करणारे आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीही बैठक झालेली नाही. गेल्या दीड वर्षांपासून सातत्याने अशा अफवा पसरवून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यात तिळमात्र तथ्य नाही,” असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी या सर्व शक्यता धुडकावून लावल्या. (Operation Tiger)
केवळ राजकीय नेत्यांवर टीका न करता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांनाही खडे बोल सुनावले आहेत. केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा खोट्या बातम्या पसरवणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. एकीकडे शिवसेना उबाठाच्या खासदारांनी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला असताना आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीचा दावाच फेटाळल्यामुळे, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील अविश्वासाचे वातावरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. (Operation Tiger)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
