महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची आणि ऐतिहासिक अशी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना आता युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्रदान केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ किल्ले आणि तामिळनाडूतील एक जिंजीच्या किल्ल्याचा समावेश आहे. या ऐतिहासिक निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगभरातील शिवप्रेमींचे अभिनंदन केले आहे. त्यांनी नमूद केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि केंद्र सरकारच्या सक्रिय सहभागामुळे हे शक्य झाले आहे. या किल्ल्यांना मिळालेल्या जागतिक मान्यतेमुळे आता त्यांची माहिती जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचेल आणि महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची महती सर्वदूर पसरेल. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक गौरवाचे प्रतीक; ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब, केंद्रीय मंत्री Piyush Goyal यांचे गौरवोद्गार! )
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“सर्वात आधी जगभरातील शिवप्रेमींचं मी मनापासून अभिनंदन करतो. हे १२ किल्ले हे जागतिक वारसा स्थळ घोषित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. खरं म्हणजे मोदींकडे सात वेगवेगळ्या संस्था गेल्या होत्या. पण तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो. कारण त्यांनी त्यापैकी हा निर्णय केला की जागतिक वारसा स्थळ म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले नामनिर्देशित करण्यासाठी प्रयत्न केले. यातील ११ किल्ले हे महाराष्ट्रात आहेत आणि एक किल्ला तमिळनाडूमध्ये आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
“या १२ ही किल्ल्यांचं स्थापत्य कशा प्रकारे तयार करण्यात आलं? याच्या जागा कशा शोधण्यात आल्या? नैसर्गिक गोष्टीत कशा प्रकारे स्थापत्य तयार करण्यात आलं? कशा प्रकारे किल्ल्यांचे दरवाजे तयार करण्यात आले होते? अशा सर्व गोष्टी आपण युनेस्को समोर ठेवल्या. ही सर्व प्रक्रिया जवळपास एक वर्ष सुरु होती. त्यांच्या काही अधिकाऱ्यांनी किल्ल्यांना भेटी देखील दिल्या. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीसाठी मतदान करण्यासाठी २० देशांना मतदान करण्याचा अधिकार आहे. त्या देशांच्या अँबेसेटरबरोबर आम्ही संवाद साधला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि सचिवांनी देखील संवाद साधला. तसेच आम्ही यासाठी पंतप्रधान मोदींची भेट देखील घेतली होती”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पर्यटनाला मिळणार नवी चालना आणि संवर्धनाला प्रोत्साहन
या जागतिक मानांकनामुळे महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे. युनेस्कोच्या संकेतस्थळावर (UNESCO website) आता या किल्ल्यांची सविस्तर ऐतिहासिक माहिती उपलब्ध होणार असून, ते जागतिक पर्यटन नकाशावर प्रमुख स्थळे म्हणून चमकतील. यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. केवळ पर्यटनच नव्हे, तर या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि दुरुस्तीसाठी युनेस्कोचे नियम लागू होतील. यामुळे या ऐतिहासिक वास्तूंचे जतन अधिक चांगल्या पद्धतीने केले जाईल आणि त्यांच्या भव्यतेचा अनुभव येणाऱ्या पिढ्यांनाही घेता येईल. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
(हेही वाचा – छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले वर्ल्ड हेरिटेजमध्ये, पंतप्रधान Narendra Modi यांनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले…)


