Ranji Trophy : मुंबई विरुद्ध विदर्भ असा रंगणार अंतिम फेरीचा सामना

दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भाने मध्यप्रदेशचा ६२ धावांनी पराभव केला. 

130
Ranji Trophy : मुंबई विरुद्ध विदर्भ असा रंगणार अंतिम फेरीचा सामना
  • ऋजुता लुकतुके

रणजी करंडकाच्या (Ranji Trophy) अंतिम फेरीत यंदा मुंबई विरुद्ध विदर्भ असे महाराष्ट्रातील दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत. मुंबईने दोन दिवसांपूर्वी तामिळनाडूचा एक डाव आणि ७० धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. तर बुधवारी विदर्भाने मध्यप्रदेशचा ६२ धावांनी आरामात पराभव करत अंतिम फेरीत जागा मिळवली आहे. (Ranji Trophy)

उपांत्य सामन्याच्या पाचव्या दिवशी मध्यप्रदेश संघाला विजयासाठी ९३ धावा हव्या होत्या. आणि त्यांचे ४ गडी बाद व्हायचे होते. पण, हे आव्हान शेवटच्या दिवशीच्या खेळपट्टीवर तसं कठीणच होतं. आणि अखेर त्यांचा अख्खा डाव २५८ धावांत आटोपला. दिवसाच्या पहिल्या सत्राच्या अर्ध्या तासातच कसोटीचा निकाल लागला. दुसऱ्या डावात विदर्भाकडून अक्षय वखरे आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. (Ranji Trophy)

(हेही वाचा – Lavasa City : लवासाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी; शरद पवारांचा विरोध)

मध्यप्रदेशचा उर्वरित संघ फक्त ३१ धावांत गुंडाळला

यश दुबेची ९४ धावांची शानदार खेळी आणि त्याने हर्ष गवळीबरोबर केलेली शतकी भागिदारी यांच्या जोरावर विदर्भाने दुसऱ्या डावात ४०२ धावांचा डोंगर उभा केला होता. आणि मध्यप्रदेशसमोर जिंकण्यासाठी ३२० धावांचं आव्हान उभं ठाकलं होतं. मध्यप्रदेशने दुसऱ्या डावात सुरुवात तर चांगली केली. आणि सलामीवीर यश ठाकूरने ९४ धावा करत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. चौथ्या दिवशी तिसऱ्या सत्रात त्यांची अवस्था २ बाद १२८ अशी सुस्थितीत होती. (Ranji Trophy)

पण, त्यानंतर सागर सोळंकी, शुभमन शर्मा हे फलंदाज झटपट बाद झाले तर वेंकटेश अय्यर (१९) आणि सारांश जैन (२५) यांनी थोडीफार खिंड लढवली. पण, ते बाद झाल्यावर मध्यप्रदेशचा उर्वरित संघ फक्त ३१ धावांत गुंडाळला गेला. आता विदर्भाची अंतिम फेरीत गाठ मुंबईशी पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे दोन संघ यावेळी रणजी स्पर्धेत (Ranji Trophy) करंडकासाठी भिडणार आहेत. (Ranji Trophy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.