लॉकडाऊन नंतर वाढले महिलांवरील अत्याचार! इतकी वाढली संख्या

मुंबई पोलिसांनी दिलेल्या एका आकडेवारीवरुन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

105

साकीनाका येथे नुकत्याच झालेल्या बलात्काराच्या निंदनीय घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच बाबतीत मुंबई पोलिसांनी दिलेल्या एका आकडेवारीवरुन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर मुंबईत महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्याचे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. जानेवारी ते जुलै 2021 या सात महिन्यांच्या कालावधीत मुंबईत बलात्काराचे सुमारे 750 गुन्हे दाखल झाले असून, विनयभंगाच्या एकूण 1100 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंता वाढवणारी आहे.

गेल्या सात महिन्यांत वाढले गुन्हे

साकीनाका येथे 30 वर्षीय महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचारांमुळे संपूर्ण राज्यभर संतापाची लाट आहे. या घटनेत पीडित महिलेचा मृत्यू झाला. गेल्या वर्षीपासून राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला होता. यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरील वर्दळ कमी झाली. पण जानेवारीपासून निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे.

(हेही वाचाः साकीनाका बलात्कार प्रकरण : सेनेने वेधले हाथरस, कठुआ प्रकरणांकडे लक्ष!)

इतक्या गुन्ह्यांची नोंद

गेल्या वर्षी जानेवारी ते जुलै या महिन्यांत बलात्काराच्या एकूण 377 घटनांची नोंद झाली होती. यापैकी 299 घटनांमध्ये दोषी असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली. पण 2021 मध्ये याच सात महिन्यांच्या कालावधीत बलात्कारांच्या घटनांमध्ये फार मोठी वाढ झाली आहे. जानेवारी ते जुलै 2021 या कालावधीत अशा एकूण 550 गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यातील 445 गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे.

विनयभंगाच्या घटनाही वाढल्या

बलात्कारांच्या घटनांसोबतच विनयभंगाला बळी पडलेल्या महिलांची संख्या सुद्धा 2021 मध्ये वाढली आहे. 2020 मध्ये पहिल्या सात महिन्यांत विनयभंगाचे एकूण 985 गुन्हे दाखल करण्यात आले होते. पण 2021 मध्ये याच कालावधीत ही संख्या 1100 इतकी झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींवर होणा-या अत्याचारांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 2020 या संपूर्ण वर्षात बलात्काराचे 767, तर विनयभंगाचे 1945 गुन्हे दाखल झाले होते.

(हेही वाचाः साकीनाका बलात्कार प्रकरण : एक महिन्यात तपास होणार पूर्ण!)

अल्पवयीन मुली पडतात बळी

बलात्कारासारखे भ्याड कृत्य करणा-या नराधमांच्या अत्याचारांना अल्पवयीन मुली मोठ्या प्रमाणात बळी पडत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. मुंबईत यावर्षी झालेल्या बलात्काराच्या 550 घटनांमध्ये 323 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाले असून, 227 प्रौढ महिलांवर बलात्कार झाल्याची माहिती मिळत आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत या पहिल्या सात महिन्यांमध्ये विनयभंगाचे एकूण 243 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

इतके आहेत हुंडाबळी

हुंडाबळीची हीन प्रथा नष्ट झाल्याचे बोलले जात असले तरी त्याचे समूळ उच्चाटान झालेले नाही, हे हुंडाबळींच्या घटनांवरुन स्पष्ट होते. मुंबईत हुंडाबळीच्या एकूण 8 घटना घडल्या असून, हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी 397 महिलांनी पोलिस स्थानकांत तक्रार दाखल केली आहे.

(हेही वाचाः मुंबईतील ‘निर्भया’ची मृत्यूची झुंज ठरली अपयशी!)

यावर्षी महिलासंबंधी दाखल झालेले गुन्हे

१ जानेवारी २०२१ ते ३१ जुलै २०२१

  • १८ वर्षांखालील बलात्काराचे गुन्हे दाखल ३२३ उघडकीस आलेले ३०३
  • १८ वर्षांपुढील दाखल २२७ उघडकीस आलेले १४२
  • १ वर्षांखालील अपहरण – दाखल ६२२ उघडकीस आलेले ५१५
  • १८ पेक्षा पुढील अपहरण – दाखल ५ उकल २
  • विनयभंग दाखल ११०० उकल ८६०
  • भादंवि कलम ५०९ प्रमाणे दाखल ३०४ उकल २२३
  • हुंडा मागणे – दाखल ८ उकल ५
  • हुंडाबळी – दाखल १ उकल १
  • हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ – दाखल गुन्हे ३९७ उकल १४५
  • आत्महत्येस प्रवृत्त करणे – दाखल १९ उकल १३
  • विविध कारणावरून मानसिक, शारीरिक छळ – दाखल ३२ उकल ८

मागील वर्षी सात महिन्यांत घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी

  • १ जानेवारी २०२० ते ३१ जुलै २०२० दरम्यान बलात्काराचे ३७७ बलात्कार गुन्हे दाखल उकल २९९
  • विनयभंग ९८५ उकल गुन्हे ७३३
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.