- कल्याण : प्रतिनिधी
कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच परिसरातील महावितरणच्या (MSEDCL) सर्व ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अर्थात महापारेषणकडून २२०-केव्ही पडघा–पाल वीजवाहिनीच्या क्षमतावाढीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम २६ जुलै ते २५ ऑगस्ट या कालावधीत सुरू राहणार आहे. या कामामुळे कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील विविध भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
या कालावधीत संबंधित भागातील वीजपुरवठा २२०-केव्ही पडघा–जांभूळ या पर्यायी वीजवाहिनीद्वारे सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र पर्यायी वीजवाहिनीत अचानक तांत्रिक बिघाड झाल्यास काही भागात तात्पुरता वीजपुरवठा खंडित (Power Outage) होऊ शकतो. तसेच आवश्यकतेनुसार चक्रीय पद्धतीने म्हणजेच लोडशेडिंगद्वारे वीजपुरवठा नियंत्रित केला जाऊ शकतो.
(हेही वाचा – Jammu-Kashmir: कुलगाममधील दहशतवादी हल्ल्यात छत्तीसगडच्या दुसऱ्या मजुराचाही मृत्यू)
महापारेषणने याबाबत ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हे क्षमतावाढीचे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, विश्वासार्ह आणि अखंड होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भविष्यात उन्हाळा आणि पावसाळ्यात होणाऱ्या खंडित होण्याच्या समस्या कमी होतील. ग्राहकांनी या एक महिन्याच्या कालावधीत आवश्यक ती खबरदारी घ्यावी. बँका, दवाखाने, रूग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि घरगुती वापरासाठी इन्व्हर्टर, टॉर्च यांसारख्या पर्यायी व्यवस्थेची तयारी ठेवावी. तसेच संभाव्य वीजखंडित (Power Outage) होण्याची शक्यता लक्षात घेऊन दैनंदिन कामांचे नियोजन करावे, असे आवाहन महापारेषणच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

