- ऋजुता लुकतुके
Monsoon at Risk : देशातील मान्सूनवर पुन्हा एकदा संकटाचे ढग दाटले असून, भारतीय हवामान विभागाने (IMD) ऑगस्ट-सप्टेंबर या मान्सूनच्या उत्तरार्धात देशाच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचवेळी एल निनोची (El Nino) तीव्रता वाढत असल्याचा इशारा देण्यात आला असून, त्याचा भारतासह जगभरातील हवामानावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे.
हवामान विभागाने आपल्या ताज्या अंदाजात सांगितले की, मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात देशाच्या अनेक भागांत ‘below normal rainfall’ होण्याची दाट शक्यता आहे. काही भागांमध्ये सामान्य ते जास्त पाऊस होऊ शकतो, मात्र एकूणच ऑगस्ट-सप्टेंबर कालावधी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरात मध्यम स्वरूपाच्या एल निनोची परिस्थिती निर्माण झाली आहे. समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानातील वाढ कायम असून, पुढील काही महिन्यांत एल निनो आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मॉडेल्सनुसार, मान्सूनच्या उर्वरित कालावधीतही एल निनोचा प्रभाव वाढत राहू शकतो.
(हेही वाचा – Kokan Railway: सीएसएमटी ते सावंतवाडी स्थानकांदरम्यान नवीन नियमित एक्स्प्रेस सुरू, कोकणवासीयांना दिलासा; वेळापत्रक पाहा)
एल निनोमुळे सामान्यतः भारतातील नैऋत्य मान्सून कमकुवत होतो. याचा परिणाम शेती, पाणीसाठे, वीज निर्मिती आणि अन्नसुरक्षेवर होऊ शकतो. विशेषतः खरीप पिकांसाठी ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (António Guterres) यांनीही एल निनोच्या वाढत्या प्रभावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी “एल निनो आधीच आगीच्या विळख्यात सापडलेल्या पृथ्वीला आणखी इंधन पुरवत आहे” असे म्हटले आहे. जागतिक हवामान संघटनेने एल निनोमुळे उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, अतिवृष्टी आणि जंगलातील आगी यांसारख्या तीव्र हवामान घटनांचा धोका वाढल्याचा इशारा दिला आहे.
केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयानेही संसदेत माहिती देताना ऑक्टोबर-डिसेंबर २०२६ दरम्यान एल निनो आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. मात्र त्याचा भारतावर नेमका किती परिणाम होईल, हे महासागर आणि वातावरणातील पुढील बदलांवर अवलंबून राहील.
हवामान विभागाने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून नियमित अंदाज आणि सूचना जारी केल्या जातील, असे स्पष्ट केले आहे. मात्र एल निनोच्या वाढत्या प्रभावामुळे शेतकरी, जलसंपदा व्यवस्थापन यंत्रणा आणि राज्य सरकारांनी सावध राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

