पालक वेळ देत नसल्यामुळे अल्पवयीन मुलीने वाढदिवसालाच सोडले घर

99

सध्या धावपळीच्या आणि व्यस्त आयुष्यात कुटुंबाला वेळ देणे फार कठीण झाले आहे. पण, यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. खासकरून पालकांसाठी ही सवय अत्यंत धोकादायक ठरू शकते. कारण याचा प्रत्यय छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आहे. आपल्या कामात व्यग्र असणाऱ्या आई-वडील वेळ देत नसल्यामुळे १३ वर्षांच्या अल्पवयीने मुलीने वाढदिवसाच्या दिवशीच घर सोडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मुलीचा शोध घेतल्यानंतर ही घटना समोर आली आहे. चिकलठाणा परिसरातील ही घटना आहे.

नक्की काय घडले?

१३ वर्षांच्या या मुलीचे आई-वडील पेशाने शिक्षक आहेत. एका खासगी शाळेत ते शिकवतात. पण ते वेळ देत नसल्यामुळे आणि फिरायला घेऊन जात नसल्यामुळे मुलगी कंटाळी होती. त्यामुळे तिने वाढदिवसाच्या दिवशी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिने १२ वयाच्या दोन मैत्रिणींसोबत बाहेर जाण्याचे नियोजन केले.

त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता तिने घर सोडले आणि मैत्रिणींना भेटली. त्यानंतर चिकलठाणातून रिक्षा करून त्या तिघी छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकात पोहोचल्या आणि आठ वाजता मनमाडकडे जाणाऱ्या रेल्वेत बसल्या. रात्री दहा वाजता मनमाडमध्ये उतरल्या. ती संपूर्ण रात्र तिघींना रेल्वे स्थानकात काढली. एकीकडे मुली रेल्वे स्थानकात रात्र काढत असताना दुसरीकडे पालकांनी पोलीस ठाणे गाठले होते. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

पण एक रात्र रेल्वेस्थानकात काढल्यानंतर सुदैवाने मुलींचा विचार बदलला आणि त्यांनी पुन्हा आपले घर गाठले. यावेळी सीसीटीव्ही कॅमेरात मुली दिसून आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताबडतोब ताब्यात घेऊन पालकांना यासंदर्भात माहिती दिली. मग मुलींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना बाल न्यायमंडळासमोर हजर केले. आता संबंधित पालकांकडे मुलींचा ताबा देण्यात येणार आहे.

(हेही वाचा – महापालिकेचे १८०० विद्यार्थी उचलणार टॅलेंटचे इंद्रधनुष्य)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.