स्वातंत्र्यवीर सावरकर : राष्ट्रवाद ते मानवतावाद…

194
वीर सावरकरांनी आजन्म हिंदुत्वाचा आणि हिंदुराष्ट्राचा आग्रह धरला. त्यावरुन सावरकरांवर पक्षपात केल्याची टीका होते. मात्र हिंदुत्व या ग्रंथाचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येते की हिंदुत्व या ग्रंथासारखा दुसरा वैश्वीक ग्रंथ नाही. तत्कालीन कॉंग्रेसने जरी हिंदी राष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला असला तरी तत्कालीन मुसलमान समाजाने त्यास केराची टोपली दाखवली होती हे उघड सत्य नाकारुन कसे चालेल? हिंदी राष्ट्रवाद अपयशी ठरल्यामुळे सावरकरांनी मांडलेला हिंदु राष्ट्रवाद हा श्रेयस्कर ठरतो.
सावरकरांनी हिंदु राष्ट्रवाद मांडल्यामुळे आणि हिंदुत्वाचा सिद्धांत सांगितल्यामुळे पुरोगाम्यांनी सावरकरांना दूर केले. मुळात भारताचे विभाजन धर्माच्या आधारावर झाले, मग कॉंग्रेस कोणत्या आधारावर ऐक्याच्या गप्पा मारत होती? कॉंग्रेसने कधीही आपली चूक स्वीकारली नाही. याचे गंभीर परिणाम हिंदू समाजाला भोगावे लागले आहेत. आजही कॉंग्रेस अल्पसंख्याक असे शब्द वापरते. जर सगळेच समान आहेत, हे हिंदी राष्ट्र आहे तर मग अल्पसंख्यांक हा प्रश्न कसा उद्भवतो? याचे उत्तर तत्कालीन कॉंग्रेसच्या नेत्यांनी दिले नाही आणि आताच्या नेत्यांमध्ये इतकी जाण राहिलेली नाही.

मानवतावाद आपल्यासाठी आत्महत्याच ठरेल

धनंजय कीर म्हणतात, ‘राष्ट्रवाद हे मानवतेच्या मार्गावरचे पाऊल आहे आणि अखिल मानवराज्य हेच मानवाचे ध्येय आहे, अशी सावरकरांची श्रद्धा होती. मात्र कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल.’ असे सावरकर म्हणतात. हिंदू समाजाला मानवतावाद हवा आहे. परंतु हा मानवतावाद आपण स्वीकारला आणि समोरच्याने स्वीकारला नाही तर हा मानवतावाद आपल्यासाठी आत्महत्याच ठरेल. सावरकर म्हणतात, ‘जगातील मानवानी एक व्हावे ही सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे.

हिंदुत्व हा शब्द नसून, तो इतिहास 

सावरकरांनी हिंदुराष्ट्रावाद मांडला असला तरी सावरकर म्हणतात, ‘राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल.’ म्हणून सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद आणि त्यांचे हिंदुत्व हे वैश्वीक आहे. ज्ञानदेवांनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले, सावरकरांची भावना ज्ञानदेवांप्रमाणेच आहे. मात्र सावरकर हे क्षात्रतेज असलेले ज्ञानदेव आहेत. त्यामुळे जगाच्या कल्याणासाठी हिंदुंचे कल्याण झाले पाहिजे. सावरकर म्हणतात, ‘हिंदुत्व हा शब्द नसून, तो इतिहास आहे.’ भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे सावरकरांना वसुधैव कुटुंबकम हेच अपेक्षित आहे आणि ‘परित्राणाय साधूनां’ यासह ‘विनाशाय च दुष्कृताम’ हेही अपेक्षित आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.