TMC फुटीचा मोठा परिणाम! ममता बॅनर्जी, ऋतब्रत बॅनर्जी गटाकडून नाव-चिन्ह हिरावलं; आता पुढे काय?

TMC फुटीचा मोठा परिणाम! ममता बॅनर्जी, ऋतब्रत बॅनर्जी गटाकडून नाव-चिन्ह हिरावलं; आता पुढे काय?

20
EC Freezes TMC Name and Symbol
EC Freezes TMC Name and Symbol

EC Freezes TMC Name and Symbol : पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. निवडणूक आयोगाने (ECI) गुरुवारी, १७ सप्टेंबर रोजी अंतरिम आदेश जारी करत ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे पक्षाचे नाव आणि ‘दोन फुले व गवत’ हे अधिकृत निवडणूक चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी आणि ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांना आगामी पोटनिवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसचे मूळ नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही.

(हेही वाचा : FDA चा राज्यभरात ‘महाछापा’! नागपुरात १२ लाखांचा गुटखा पकडला; मुंबईतील १४ आस्थापनांचे परवाने निलंबित)

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत पक्षाच्या नावासाठी प्रत्येकी तीन पर्याय आणि निवडणूक चिन्हासाठी प्रत्येकी तीन पर्याय सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. चिन्हांसाठी आयोगाच्या सध्याच्या मुक्त चिन्हांच्या यादीतून पर्याय निवडावे लागणार आहेत. त्यानंतर आयोग प्रत्येक गटासाठी स्वतंत्र नाव आणि चिन्ह निश्चित करणार आहे.

पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णय

पश्चिम बंगालमधील नंदिग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुका ६ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. दोन्ही गटांनी या निवडणुकांसाठी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पक्षाचे नाव आणि चिन्ह कोण वापरणार, याबाबत निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी आयोगाने अंतरिम व्यवस्था लागू केली आहे.

आयोगाच्या आदेशानुसार, ही व्यवस्था Election Symbols (Reservation and Allotment) Order, 1968 मधील परिच्छेद १५ अंतर्गत अंतिम निर्णय होईपर्यंत लागू राहणार आहे. आयोगाने दोन्ही गटांना समान संधी देण्यासाठी आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी हा अंतरिम निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा 🙂

दोन्ही गटांची आयोगासमोर बाजू

या प्रकरणी निवडणूक आयोगाने १७ सप्टेंबर रोजी दोन्ही गटांची स्वतंत्रपणे सुनावणी घेतली. ममता बॅनर्जी यांच्या गटाने अंतरिम आदेशाला विरोध केला. अशा प्रकारचा अंतरिम आदेश देण्यासाठी पुरेसा आधार नसल्याचा युक्तिवाद या गटाकडून करण्यात आला. तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनीही आयोगाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. दुसरीकडे, ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गटाने आगामी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली होती. दोन्ही गटांकडून आयोगासमोर आपापल्या दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे आणि युक्तिवाद साद करण्यात आले.

आता पुढे काय?

निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशामुळे सध्या दोन्ही गटांना तृणमूल काँग्रेसचे अधिकृत नाव आणि ‘दोन फुले व गवत’ हे चिन्ह वापरता येणार नाही. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत दोन्ही गटांना तीन नावे आणि तीन मुक्त चिन्हांचे पर्याय द्यावे लागणार आहेत. त्यापैकी आयोग प्रत्येक गटासाठी एक नाव आणि एक चिन्ह मंजूर करेल.

दरम्यान, पक्षाचे नाव आणि चिन्ह यावर अंतिम अधिकार कोणत्या गटाला मिळणार, याचा निर्णय निवडणूक आयोगाच्या पुढील कार्यवाहीत होणार आहे. तोपर्यंत दोन्ही गटांना स्वतंत्र ओळखीसह आगामी पोटनिवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.