‘त्या’ भेटीमुळे शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेसवर नाराज?

काँग्रेसला महाविकास आघाडीवर विश्वास उरला नाही का? ज्यामुळे अशाप्रकारे विनंत्या कराव्या लागल्या? असा सूर आता महाविकास आघाडीत उमटू लागला आहे.

107

राज्यातल्या ठाकरे सरकारला आता लवकरच दोन वर्षे पूर्ण होतील. मात्र या सरकारमधील अंतर्गत वाद काही मिटताना दिसत नाहीत. पुन्हा एकदा सरकारमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाले असून, आता तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

…म्हणून काँग्रेसवर नाराजी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यसभेची पोट निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी या दोन्ही नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली. मात्र यावेळी फडणवीस यांनीही राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करायची असेल, तर त्या बदल्यात भाजपाच्या निलंबित 12 आमदारांवरील कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने लोटांगण घातले की काय, अशी भावना आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झाली आहे. याचमुळे आता हे दोन्ही पक्ष काँग्रेसवर नाराज असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसला महाविकास आघाडीवर विश्वास उरला नाही का? ज्यामुळे अशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन विनंत्या कराव्या लागल्या? असा सूर आता महाविकास आघाडीत उमटू लागला आहे.

(हेही वाचाः हा तर दैनिक बाबर… अग्रलेखावरुन राणेंचा शिवसेनेशी ‘सामना’)

हे आहेत उमेदवार

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजीव सातव यांच्या निधनानं राज्यसभेतील त्यांची जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. रजनी पाटील ह्या सध्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी आहेत. त्या आधीही राज्यसभेच्या खासदार होत्या. त्यानंतर आता त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेसाठीही राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतही रजनी पाटील यांचे नाव आहे. तो निर्णय अजून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. त्याच पार्श्वभूमीवर रजनी पाटील यांना उमेदवारी दिली गेली आहे. तर भाजपाकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

काय म्हणाले थोरात?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल महसूल मंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना विचारले असता फक्त राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. अन्य कुठलाही प्रस्ताव भाजपाकडून ठेवण्यात आला नाही, असे सांगण्यात आले.

(हेही वाचाः सोसायट्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक नेमाव्यात… महिला सुरक्षेसाठी पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.