ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरजः शिवसेनेचे आमदार बरळले

मीच 10 हजारांची फौज आणतो, शस्त्र आणतो, त्यांना आपण सरळ करू.

83

नेहमीच वादग्रस्त विधान करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड आता पुन्हा एकदा बरळले आहेत. ॲट्रॉसिटीचा धाक दाखवणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे म्हणत, गावांत अशा हल्ल्यांचे प्रकार पुन्हा झाले तर मीच 10 हजारांची फौज आणतो, शस्त्र आणतो, त्यांना आपण सरळ करू, असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण?

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या वाघ कुटुंबावर 19 जूनला हल्ला झाला होता. ॲट्रॉसिटीचा धाक दाखवत चितोडा येथील गावगुंड पोत्या ऊर्फ रमेश हिवराळे याने गावात उच्छाद मांडला. बुधवारी चितोडा गावाला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भेट दिली. आम्ही तुमच्यासोबत आहोत, घाबरण्याची गरज नाही. अशा शब्दांत त्‍यांनी हल्ला झालेल्या वाघ कुटुंबाला धीर दिला.

(हेही वाचाः पडळकरांवर राष्ट्रवादी काँग्रेस का चिडली?)

नेमकं काय म्हणाले गायकवाड?

बिहार आणि उत्तर प्रदेशला लाजवणारा हा हल्ला आहे, गुंडगिरी या गावात फोफावली आहे. ॲट्रॉसिटी हा कायदा रक्षणासाठी आहे, मात्र या कायद्याचा वापर ब्लॅकमेलिंग करता येथे केला जातो. ॲट्रॉसिटीचा धाक दाखवून पैसे उकळले जातात, अवैध धंदे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतात. एक विशिष्ट समाज कमी संख्येने असल्याने आणि संघटित नसल्याने इथे वारंवार हल्ले होतात. मागच्या एका प्रकरणात आत्महत्या केलेल्या तरुणाच्या खिशात चिठ्ठी सापडूनही गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे दहशत तयार झाली आणि दुर्दैवाने सगळ्या समाजानेही त्याला साथ दिल्याचे गायकवाड म्हणाले. तसेच ॲट्रॉसिटी कायद्याचा कुणी धाक दाखवत असेल तर तुम्हीही त्याच्याविरोधात दरोड्याची तक्रार द्या. खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांना संघटित होऊन उत्तर द्या, असे ते म्हणाले. तसेच गावगुंडाचे समर्थन लोक करतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्यावर कुणी अन्याय करत असेल, तर आसपासच्या 25 गावांच्या तरुण पोरांची संघटित टीम बनवा. अन्याय होईल तेव्हा सर्व जण तुटून पडा. भविष्यात जर इथे आणखी असा हल्ला झाला, तर मी स्वतः 10 हजारांची फौज घेऊन येईन आणि एका फटक्यात सरळ करेन, असेही आमदार गायकवाड म्हणाले.

याआधी अनेकदा वादग्रस्त विधाने

संजय गायकवाड यांचे हे पहिलेच वादग्रस्त विधान नाही. त्यांनी याआधी अनेकदा वादग्रस्त विधाने केलेली आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातच कोंबून टाकले असते असे विधान त्यांनी केले होते. तसेच करोनामध्ये मंदिरे बंद आहेत, देव पण लॉक करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कुणीच येणार नाही, स्वतःलाच स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. म्हणून हे उपास-तापास बंद करा, रोज ४ अंडी खा, एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटिनयुक्त पदार्थ भरपूर खा, असा सल्ला बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी हिंदू समाजबांधवांना दिला होता. या सल्ल्यामुळे गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

(हेही वाचाः अविनाश भोसले यांना ईडीचे समन्स)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.