President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले ‘ग्रंथालय महोत्सवा’चे उद्घाटन

ग्रंथालयांचा विकास हा समाज आणि संस्कृतीच्या विकासाशी निगडीत आहे

147
President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले 'ग्रंथालय महोत्सवा'चे उद्घाटन
President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले 'ग्रंथालय महोत्सवा'चे उद्घाटन

ग्रंथालयांचा विकास हा समाज आणि संस्कृतीच्या विकासाशी निगडीत आहे. तसेच सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रगतीचेही ते माप आहे. यासाठी, ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि डिजिटाइझेशनला गती देण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले. त्या ‘ग्रंथालय महोत्सव २०२३’ च्या उद्घाटना प्रसंगी बोलत होत्या.

राजधानीतील प्रगती मैदान येथे हॉल क्रमांक ५ येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे, ′ग्रंथालय महोत्सव २०२३′ चे आयोजन करण्यात आले होते. कायदा आणि न्याय मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि सांस्कृतिक व संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन, प्रख्यात कवियित्री व पहिल्या महिला साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या डॉ. अनामिका मंचावर यावेळी उपस्थित होत्या. यासोबत सर्व राज्यांचे शासकीय ग्रंथालय प्रतिनिधीही उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाचे ग्रंथालय संचालक, डॉ. दत्तात्रय क्षिरसागर व अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. शाळेतील मुलेही बहुसंख्येने याप्रसंगी उपस्थित होते.

ग्रंथालये हस्तलिखितांचे जतन करतात तसेच इतिहास आणि अमर्याद भविष्यातील दरी ही सांधतात. ग्रंथालयांच्या विकासाला प्राधान्य देऊन, ग्रंथालये हा विकासाप्रती मानवकेंद्री दृष्टिकोनाचा अत्यावश्यक भाग म्हणून, तसेच ग्रंथालयांच्या विकासाला आणि डिजिटलायझेशनला गती देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने “ग्रंथालय महोत्सव २०२३” चे दोन दिवसीय आयोजन केले आहे. यावेळी बोलताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, ग्रंथालयांच्या विकासाचा, समाज आणि संस्कृतीच्या विकासाशी संबंध आहे. हे सभ्यतेच्या प्रगतीचेही एक माप आहे. ग्रंथालये ही सामाजिक संवादाची, अभ्यासाची आणि चिंतनाची केंद्रे बनली पाहिजेत. इतिहास अशा संदर्भांनी भरलेला आहे ज्यात आक्रमणकर्त्यांनी ग्रंथालये नष्ट करणे आवश्यक मानले. यावरून असे दिसून येते की ग्रंथालये एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या सामूहिक चेतनेचे आणि बुद्धीचे प्रतीक मानले गेले आहेत.

राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले की, ग्रंथालये ही संस्कृतींमधील पुलाचे काम करतात. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात अनेक देशांतील लोकांनी भारतातून पुस्तके आणली, त्यांची भाषांतरे केली आणि ज्ञान मिळवले. पुस्तके आणि ग्रंथालये हा मानवतेचा समान वारसा आहे. एका छोट्या पुस्तकात जगाच्या इतिहासाची दिशा बदलण्याची क्षमता आहे. पुढे सांगताना, गांधीजींच्या आत्मचरित्राचा संदर्भ दिला, जिथे त्यांनी जॉन रस्किन यांच्या ‘अनटू दिस लास्ट’ या पुस्तकाचा त्यांच्या जीवनावर मोठा सकारात्मक प्रभाव टाकला असल्याचे त्यांनी माहिती दिली.

(हेही वाचा – अन् ‘त्या’ वृद्धाला सात वर्षांनंतर निवांत झोप मिळाली)

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, हस्तलिखितांचे संवर्धन आणि ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि डिजिटलायझेशनसाठी प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाच्या वापराने ग्रंथालयांचे स्वरूप बदलत आहे. यावेळी माहिती देताना, ‘वन नेशन, वन डिजिटल लायब्ररी’ हे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘नॅशनल व्हर्च्युअल लायब्ररी ऑफ इंडिया’ विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. नॅशनल मिशन ऑन लायब्ररीच्या यशामुळे ग्रंथालयांशी जोडण्याची आणि पुस्तके वाचण्याची संस्कृती बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा महोत्सव ‘आझादी का अमृत महोत्सवा’च्या दुसऱ्या टप्प्याचा एक भाग आहे. ग्रंथालयांच्या विकासाला आणि डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी आणि वाचन संस्कृती जोपासण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी सुसंगत आहे.

महोत्सवात प्रदर्शने, पुस्तकांची दालने

लेखक सत्र, मुलांसाठी कार्यशाळा, मुलांसाठी गॅलरी आणि ग्रंथालयांच्या डिजिटायझेशनवर पॅनेल चर्चा सत्रांचा समावेश असेल. ज्ञानाचा उत्सव साजरा करणे, इतिहास आणि भविष्यातील अंतर कमी करणे आणि वाचनाची आवड वाढवणे हा या मागचा उद्देश आहे.

‘ग्रंथालय महोत्सव २०२३’ या महोत्सवाच्या समारोप समारंभाला उपराष्ट्रपती जगदीप धनखड उपस्थित राहणार आहेत. भारतातील ग्रंथालयांचे आधुनिकीकरण आणि डिजिटायझेशन यावर संवाद सुरू करण्यासाठी या महोत्सवात जगभरातील प्रतिष्ठित ग्रंथालयांची ओळखही यावेळी करून देण्यात येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.