राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल त्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
काय म्हणाले मनसे नेते संदीप देशपांडे?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्वीटनुसार, महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.
ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं असेल त्यांना लोकल ने प्रवास करण्याची परवानगी दिली पाहिजे.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 25, 2021
(हेही वाचा : गंगेत हजारो प्रेते वाहून आली, त्यावर सरसंघचालकांनी बोलावे! संजय राऊतांचे आवाहन )
परदेशात परवानगी आहे, भारतात का नाही?
याविषयी सविस्तर बोलताना संदीप देशपांडे म्हणाले कि, अमेरिकेत ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांना खुशाल फिरण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मेट्रोमधून प्रवास करू देत आहेत. इतकेच काय तर त्यांना मास्क लावण्याची सक्ती नाही. मग भारतात असा विचार का होत नाही? मुंबईतही ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांना लोकल प्रवासाला परवानगी देण्यात यावी. कारण लॉकडाऊनमुळे सर्वांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आणखी नुकसान होऊ देऊ नये. आता अनेक खासगी कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे अशा कंपन्यांना तरी काम सुरु करू द्यावे, असेही संदीप देशपांडे म्हणाले.
Join Our WhatsApp Community