महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर राज ठाकरे म्हणाले “एक युग होतं, ते संपलं. आता…”

102

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं ९६ व्या वर्षी निधन झालं आणि अवघ्या जगातून हळहळ व्यक्त होत आहे. एलिझाबेथ यांचा जन्म लंडनमध्ये २१ एप्रिल १९२६ रोजी झाला. दुसऱ्या महायुद्धापासून ते २१ व्या शतकाचे वारे जगात वाहायला लागेपर्यंतच्या इतिहासाच्या एकमेव साक्षीदार होत्या. सर्वच स्तरातून राणी एलिझाबेथ यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील फेसबुकवर पोस्ट करत राणी एलिझाबेथ द्वितीय यांना आदरांजली वाहिली आहे.

(हेही वाचा – अग्निपथ योजनेवरील हिंसाचाराची SIT चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली)

काय म्हणाले राज ठाकरे

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या. आणि ही ७० वर्ष कुठली? तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची ७० वर्ष. युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ २ ह्यांच्यामुळे, असे राज ठाकरे या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

पुढे राज ठाकरेंनी असेही म्हटले की, ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे? मुळात त्यांची गरज आहे का? असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाच्या विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानाला हाताळायचं, तर पुढे कमालीच्या स्वतंत्र बुद्धीच्या समवयस्क मार्गारेट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय ह्यांनी दाखवलं. आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लॉइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दलचं ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कुतूहल टिकलं.

कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण ७० वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ २ ह्यांच्या शिरावरून हा मुकुट उतरला. एलिझाबेथ २ ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन युग सुरु होतंय? का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाच असेल. एलिझाबेथ २ ह्यांच्या स्मृतीस अभिवादन, असे राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये शेवटी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.