-
विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेनेचा वर्धापन दिन १९ जून रोजी असून, याच दिवशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला ‘डबल झटका’ मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. केवळ खासदारच नव्हे, तर १६ आमदारही पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आल्याने ठाकरे गटाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि विधिमंडळाचे तज्ज्ञ अनंत कळसे (Anant Kalse) यांच्यातील गुप्त भेटीने या चर्चांना अधिक हवा दिली आहे. शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी तर या घडामोडींना दुजोरा देत खळबळजनक दावा केला आहे. तुमाने यांच्या म्हणण्यानुसार, ठाकरे गटातील ७ खासदार आणि १६ आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून, त्यांची ‘डील’ आता अंतिम टप्प्यात आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या या लोकप्रतिनिधींचे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाले असून, लवकरच ते जाहीरपणे शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा तुमाने यांनी केला आहे.
(हेही वाचा – Ind A vs SL A, Tri Series : वैभव आणि लंकन खेळाडूमध्ये नेमकं काय घडलं, व्हीडिओतून आलं समोर)
मात्र, या दाव्याची दुसरी बाजू पाहता, राजकीय विश्लेषकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे. सध्या ठाकरे गटाकडे असलेल्या २० आमदारांपैकी १० आमदार मुंबईतील असून, ते मातोश्रीशी एकनिष्ठ असल्याचे मानले जाते. यामध्ये आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा समावेश आहे. उर्वरित आमदारांपैकी कैलास पाटील आणि नितीन देशमुख हे बंडखोरीच्या काळातही ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते, तर भास्कर जाधव यांनीही आपण साथ सोडणार नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे.
अशा परिस्थितीत, आमदार तुमाने यांचा दावा कितपत खरा ठरणार आणि १९ जून रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात नेमका काय ‘धमाका’ होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या राजकीय हालचालींमुळे ठाकरे गटासमोरील पेच अधिक गडद झाला असून, पुढील काही तासांत होणाऱ्या घडामोडी निर्णायक ठरणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

