गणेशोत्सवानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदारांच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून कोकणातील बागायतदारांना न्याय देण्यासाठी विशेष पॅकेजची मागणी करणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. आंबा बागायतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन मार्ग काढू. याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही उदय सामंत म्हणाले.
(हेही वाचा – Monsoon Session 2022: मंत्रालयासमोर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू)
यावेळी सामंत म्हणाले, आंबा कॅनिंगचा हमीभाव ठरविण्यासाठी पणन विभाग, कृषि विद्यापीठ व आंबा बागायतदार यांनी चर्चा करावी. यावर्षीपासून कॅनिंग उद्योजकांनी स्थानिक आंबा व्यावसायिकांकडील आंबा कॅनिंगसाठी कमी पडला तरच बाहेरील राज्याकडून आंबा आयात करावा, अशी सूचना कॅनिंग उद्योजकांना देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. काजू बोंडांना अल्कोहोल आणि वायनरीची मान्यता मिळण्याकरिता प्रयत्न करण्यात येईल. लांजा तालुक्यातील शेतकऱ्याने काजू बी सोलण्याचे यंत्र विकसित केले असून त्याचे पेटंटही मिळाले आहे. हे यंत्र खरेदीसाठी सिंधुरत्न योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा प्रस्ताव मांडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
आंबा पिकाच्या नुकसान भरपाईसाठीसाठी देण्यात येणाऱ्या विमा व पीक कर्जाबाबत बँक, कृषि विभागाचे अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्याशी सामंत यांनी चर्चा केली. यावेळी आंबा बागायतदारांनी आपल्या समस्या मांडल्या. या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण केले जाईल, असे सामंत यांनी सांगितले.