Ranjit Savarkar : भारत अखंड ठेवायचा असेल तर जातीभेद सोडून हिंदूंना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही – रणजित सावरकर

रणजित सावरकर यांनी ३० व ३१ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्याचा दौरा केला. परतवाडा येथील सार्वजनिक वाचनालयात त्यांची सभा झाली.

134
भारत अखंड ठेवायचा असेल तर जातीभेद सोडून हिंदूंना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही - रणजित सावरकर

कोणत्याही संघर्षाशिवाय भारताला स्वातंत्र्य मिळाले, अशी बतावणी आपल्याकडे केली जाते. ती पुर्णतः असत्यावर आधारित असून, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राण गमावले, आपणही शत्रूंच्या कत्तली केल्या. आता स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली असली, तरी ते टिकवण्याचे नवे आव्हान आपल्यासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे भारत अखंड ठेवायचा असेल तर जातीभेद सोडून हिंदूंना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असे मत स्वातंत्र्यवीर सावरकारांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी व्यक्त केले.

रणजित सावरकर यांनी बुधवार, ३० ऑगस्ट आणि गुरुवार, ३१ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्याचा दौरा केला. बुधवारी, ३० ऑगस्टला अमरावतीमध्ये त्यांचे आगमन झाले. त्यांच्या स्वागताला अमरावती नगरी सजल्याचे दृष्य पहायला मिळाले. गुरुवारी, ३१ ऑगस्टला परतवाडा येथील सार्वजनिक वाचनालयात त्यांची सभा झाली.

या सभेला संबोधित करताना सावरकर म्हणाले, आपला इतिहास हा पराभवाचा इतिहास नाही. भारतावर अनेक आक्रमणे झाली, पण आपण त्यांना निकराचा लढा देत परतवून लावले. आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली असली, तरी ते टिकवण्याचे नवे आव्हान आपल्यासमोर उभे ठाकले आहे. या पुढची २५ वर्षे आपल्यासाठी महत्त्वाची आहेत. कारण धर्मांध शक्ती आपल्यावर हावी होऊ पाहत आहेत. त्यामुळे भारत अखंड ठेवायचा असेल तर जातीभेद सोडून हिंदूंना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही.

(हेही वाचा Veer Savarkar : ‘शिदोरी’वरील कारवाईची भूमिका स्वागतार्ह; राहुल गांधींवर दखलपात्र गुन्हा दाखल करा – रणजित सावरकर यांची मागणी)

सावरकरांनी नेहमी इतिहास अभ्यासाला महत्त्व दिले. त्यातून त्यांनी गुलामगिरीची मुळे शोधली. हिंदू समाज हा विभागलेला आहे. त्यामुळे मूठभर ब्रिटिश आपल्यावर राज्य करून गेले. त्यामुळे जोवर जातीभेदाची बंधने आपण तोडत नाही, तोवर गुलामगिरीचा फास सुटणार नाही, असे सावरकर म्हणायचे. त्यामुळे एकीतच आपले बळ आहे, हे ध्यानात घ्या, असे आवाहन रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी केले.

यावेळी परतवाडा येथील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धुंडिराज बर्वे, सुधीर सूर्यवंशी, दीक्षित महाराज, श्याम देशमुख, आशिष वहाणे, गजानन कोल्हे, नरेंद्र पाडळे, बंडू गोम आदी उपस्थित होते.

सावरकरांचे विचार कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक

  • परतवाडा येथील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष धुंडिराज बर्वे म्हणाले, रणजित सावरकर यांनी जे मार्गदर्शन केले, ते तात्याराव सावरकरांचे विचार आहेत. ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वीर सावरकरांनी क्रांतीची ज्योत पेटवली. आज स्वातंत्र्यानंतरही त्यांचे विचार आपल्याला प्रभावित करतात. हे विचार पुढील कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.
  • वीर सावरकरांसारख्या मोठ्या स्वातंत्र्य सैनिकाला नजरकैदेत ठेवणे ही आपल्या राज्यकर्त्यांची सर्वात मोठी चूक होती. त्यामुळे त्यांना अखेरच्या दिवसांत यातना भोगाव्या लागल्या, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.