‘काॅंग्रेस- राष्ट्रवादी शिवसेनेला टकमक टोकाकडे घेऊन जात आहेत’, ट्वीट करत शेलारांचा ‘मविआ’वर निशाणा

93

राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. भाजप- शिंदे गट यावरुन अजित पवार यांच्यावर टीका करत आहे. त्यातच आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांनी एकामागून एक ट्वीट करत गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरुन चांगलाच हल्लाबोल केला आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते- अजित पवार, औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा नव्हता- जितेंद्र आव्हाड, दाऊदशी व्यवहार करणा-या नवाब मलिकांच्या पक्षाच्या नेत्यांची ही विधाने महाराष्ट्राने हलक्यात घ्यावी का? ही एक औरंगजेबी चाल तर नाही ना? अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे.

( हेही वाचा: दिल्ली: कंझावाला प्रकरणी पोलिसांनी तातडीने अहवाल सादर करावा; अमित शहांचे आदेश )

जनता कडेलोट करणार

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीनचाकी सरकार आल्यापासून नियोजनबद्ध कट रचला आहे? म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणा-या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केली आहे का? या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून अण्णाजी पंत यांनी लिहिली आहे का? अशी प्रश्नांची सरबत्ती आशिष शेलार यांनी ट्वीट करत केली आहे. तसेच, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला टकमक टोकाकडे घेऊन जात आहेत. आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणा-या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे, असा इशाराही आशिष शेलार यांनी दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.