Bharat Vs Canada : कॅनडातील भारतीय वंशाच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यास भारत सक्षम!

    154
    Bharat Vs Canada : कॅनडातील भारतीय वंशाच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यास भारत सक्षम!
    Bharat Vs Canada : कॅनडातील भारतीय वंशाच्या लोकांना सुरक्षित ठेवण्यास भारत सक्षम!

    प्रवीण दीक्षीत

    खलिस्तानी दहशतवादी व संघटित गुन्हेगारी करणाऱ्या हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामधील तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. दरम्यान भारत सरकारने कॅनडामध्ये राहणारे विद्यार्थी आणि भारतीय नागरिकांच्या सतर्कतेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामध्ये भारत सरकारने कॅनडात राहणाऱ्या नागरिकांना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदू भारतीयांना धमकी देण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या कॅनडातील भारतीय लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आलेला दुरावा, त्याचा कॅनडात स्थायिक झालेल्या भारतीयांवर काय परिणाम होईल, याची चिंता आहे. मात्र असे असले तरी यामध्ये भारताच्या प्रयत्नांना अनेक देशांचा पाठिंबा आहे. त्यामुळे कॅनडावर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत आहे. कॅनडातील भारतीय वंशाच्या हिंदू लोकांना सुरक्षित ठेवण्यास भारत पूर्णतः सक्षम आहे. (Bharat Vs Canada)

    भारताचे तुकडे व्हावेत व भारताचे कॅनडाशी संबंध बिघडावेत हा पाकिस्तानचा मनसुबा

    कॅनडा व भारत यांच्यातील संबंध बिघडावेत म्हणून पाकिस्तानच्या ISI नेच निज्जर याची हत्या केली अशी दाट शक्यता आहे. नुकत्याच उपलब्ध झालेल्या सी.सी.टी.व्ही फुटेजमधून स्पष्ट होते की ६ व्यक्तींनी गुरुद्वारासमोर ५० गोळ्या चालवून निज्जरची हत्या केली आहे. हे लोक कोण होते? त्यांनी वापरलेली कार कुठे आहे? याचा तपास कॅनडाच्या पोलिसांना अद्याप लागलेला नाही. पाकिस्तानच्या सांगण्यावरून भारताचे तुकडे करण्याचा मनसुबा बाळगून असलेले खलिस्तानी आता कॅनडामधील भारतीय वंशाच्या नागरिकांना टार्गेट करू लागले आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत, अशा आशयाचा व्हिडिओही व्हायरल झाला. भारतासाठी खलिस्तानी हे काही नवे नाहीत. त्यांच्या गुप्त कारवाया सतत चालू असतात. भारत-कॅनडाच्या वादात पाकिस्ताननेच भारताचे तुकडे व्हावेत यासाठी सुरु केलेली ही चळवळ आहे. स्वतःला खलिस्तानी म्हणवणारे अनेक लोक आहेत, आजही त्यांना पाकिस्तानमध्ये राजरोसपणे राहू दिले जात आहे. त्यांना व्यवस्थित संरक्षण देण्यात येत आहे. त्यांना भक्कम पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे खलिस्तानी भारतामध्ये इतर देशांमधून ड्रग्स, अवैध शस्त्रास्त्रे यांचा धंदा करत आहेत. दहशतवादी कारवाया करत आहेत. यात प्रमुख देश म्हणजे पाकिस्तान, जर्मनी, कॅनडा, ब्रिटन, अमेरिका हे आहेत.

    दोन देशातील संबंध बिघडण्याला सर्वस्वी कॅनडा जबाबदार

    खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने भारत आणि कॅनडातील राजनैतिक संबंध तणावाचे बनले आहेत. कॅनडाने या हत्येमागे भारताचा हात असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. परंतु निज्जर दोन्ही हातात एके ४७ घेऊन उघड उघड गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. म्हणजे तिथे अशी शस्त्रास्त्रे सहजपणे उपलब्ध होत आहेत. गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडामध्ये आवाहन केले आहे की सर्व हिंदूंनी कॅनडा सोडून जावे. हे जे चालू आहे ते म्हणजे तेथील शीख लोकांचा यांना पाठिंबा आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण तेथील फार कमी लोक त्यांच्या बाजूने उभे राहतील. गेल्या अनेक वर्षांपासून हे शीख लोक जे कॅनडात स्थायिक झाले आहेत, ज्यांनी शेती करून पैसे मिळवले आहेत, त्यांची New Democratic Party आहे. त्याचे 28 खासदार आहेत. ते तेथील गुरुद्वारामध्ये एकत्र झालेले पैसे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना देतात. त्यांच्या पाठिंब्यावर टुड्रो पंतप्रधान म्हणून टिकून आहेत. त्यामुळे हे लोक जे बोलतील त्याला ट्रुडो पाठिंबा देत आहेत. शिखांच्या बाबतीत पुष्टीकरण करण्याचे ट्रुडो यांचे धोरण आहे. प्रत्यक्षात हे संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांना मदत करणारे आहे, जे खुद्द कॅनडाला सुद्धा जड जाणार आहे. पाकिस्तानमध्ये या गोष्टी लपून सुरू आहेत. मात्र कॅनडामध्ये हे राजरोसपणे सुरु आहे. त्यांचा नुसताच या अतिरेकी शिखांना पाठिंबा आहे असे नाही तर ते त्यांना प्रोत्साहन पण देत आहेत. या गुन्हेगारांच्या कारवायांची माहिती भारताने कॅनडाला अनेकवेळा दिली आहे आणि यावर कारवाई करा असेही सांगितले आहे; पण त्यावर ते काहीच करत नाहीत. त्यामुळे संबंध बिघडले आहेत. या दोन देशांतील संबंध बिघडण्याला सर्वस्वी कॅनडाच जबाबदार आहे.

    कॅनडातील भारतीयांच्या रक्षणासाठी सतर्कता
    कॅनडामधील वाढत्या भारतविरोधी कारवाया, राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्हे, गुन्हेगारी, हिंसाचारामुळे सध्या कॅनडामध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांनी तसेच प्रवासाचा विचार करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला केंद्राच्यावतीने देण्यात आला आहे. अलीकडे भारतविरोधी अजेंडा चालवणाऱ्या लोकांकडून भारतीय मुत्सद्दी आणि तेथे राहणाऱ्या भारतीय समुदायाला धमक्या दिल्या जात आहेत. भारतीय नागरिकांना कॅनडातील ज्या भागात अशा घटना घडल्या आहेत, अशा ठिकाणी प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कॅनडामधील भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी भारताचे उच्चायुक्त/वाणिज्य दूतावास कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. कॅनडातील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांना उच्चायुक्त/वाणिज्य दूतावासांमध्ये नोंदणी करण्यास सांगितले आहे. वर्षानुवर्षे कॅनडात राहणारे हे सगळे लोक जरी हिंदू असले, तरी ते कॅनडाचे नागरिक/ स्थायिक आहेत. त्यांना प्रत्यक्ष संरक्षण देणे हे शक्य नाही. मात्र संयुक्त राष्ट्र संघासारख्या आंतरराष्ट्रीय संघटना व इतर मित्र राष्ट्रे त्यांच्या संरक्षणासाठी कॅनडावर दबाव आणतील. (Bharat Vs Canada)

    New Project 2023 10 01T210702.446

    सध्याच्या सरकारकडून सावरकरांच्या विचारांचे अनुकरण

    वीर सावरकरांनी जे सांगितले ते आजही लागू पडत आहे. कारण कॅनडासोबत निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देताना भारत सरकार वीर सावरकरांची विचारसरणी अवलंबत आहेत. वीर सावरकरांचे विचार अतिशय वास्तववादी होते आणि आपले सरकारही त्याच मार्गाने जात आहे. कारण कॅनडाला समजणारी भाषा अशीच आहे. त्यासाठी आपण आर्थिकदृष्ट्या सबळ असणे गरजेचे आहे. भारताने आधुनिक तंत्र-शस्त्र यांनी सुसज्ज असावे हीच वीर सावरकरांची मागणी होती. या लोकांना जशास तसे उत्तर देणे गरजेचे आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीला उत्तर देण्याची ताकद भारताकडे आहे. म्हणूनच आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही. हे सावरकरांचे मूलभूत चिंतन आहे. त्यामुळे सावरकरांच्या विचारातील तथ्य आता भारत सरकार अंमलात आणत आहे.

    ( लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि भूतपूर्व पोलीस महासंचालक आहेत.)

    शब्दांकन : श्रुती नानल

     

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.