देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट-युजी’ (NEET-UG) परीक्षा पद्धत पूर्णपणे बदलण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. सध्याची लेखी म्हणजेच कागद-पेन (Pen-and-Paper) पद्धत बंद करून ती संगणक आधारित (Computer-Based Test) करण्याची चाचपणी सुरू असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या या परीक्षेत पेपरफुटी आणि इतर गैरप्रकार रोखण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (NEET UG Exam Reforms)
(हेही वाचा – एका शब्दाने पेटलं महाराष्ट्राचं राजकारण; मंत्रालयासमोर राष्ट्रवादीची Congress कडे जाहीर माफीची मागणी)
‘जीईई’च्या धर्तीवर दोन टप्प्यांत परीक्षेचा प्रस्ताव
राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून (NTA) आयोजित केल्या जाणाऱ्या आठ प्रमुख परीक्षांपैकी सात परीक्षा आधीच संगणकीय प्रणालीद्वारे घेतल्या जातात. आता ‘नीट’ परीक्षासुद्धा अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेप्रमाणे (JEE) मुख्य आणि प्रगत (Main and Advanced) अशा दोन टप्प्यांत घेण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. दोन टप्प्यांत परीक्षा घेतल्यास परीक्षेची सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन करता येईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
(हेही वाचा – Ganeshotsav 2026: पीओपी मूर्तीप्रकरणी हायकोर्टात अर्ज दाखल, पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत न्यायालयाचा सरकारला खरमरीत सवाल)
उच्चस्तरीय समिती आणि नवीन सुरक्षेची हमी
परीक्षा पद्धतीत सुधारणा सुचवण्यासाठी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष कृती गटाची (Task Force) स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अंतिम आराखडा तयार केला जाईल. तसेच, विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल आणि कोणताही निर्णय अचानक लादला जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले आहे. भविष्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी डिजिटल प्रश्नपत्रिका, बायोमेट्रिक पडताळणी आणि जीपीएस (GPS) आधारित कुलूप प्रणाली यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

