- मुंबई प्रतिनिधी
गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी तीन वर्षांची मुदतवाढ देण्याचा तसेच या योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा (Farmers) समावेश करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) घेण्यात आला. यापूर्वी ही योजना कुटुंबातील दोनच सदस्यांना लागू होती. आता ही योजना शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांना लागू होणार आहे.
शेती करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात, तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे मृत्यू ओढवतो किंवा अपंगत्व येते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी सर्व शेतकरी आणि खातेदार म्हणून नोंद नसलेल्या, शेतकऱ्याच्या कुटुंबातील १० ते ७५ वर्ष वयोगटातील २ जणांसाठी गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत होती. यात मृत्यू आणि अपंगत्व आल्यास दोन लाख ते एक लाखांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येते.
(हेही वाचा – Pune Auto Fare Hike: १ सप्टेंबरपासून पुण्यात रिक्षा प्रवास महागणार, प्रति किमी दर किती रुपयांनी वाढला? जाणून घ्या…)
आता या योजनेस ३१ मार्च २०३१ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली. या योजनेत भूमिहीन शेतमजुरांसह महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र मिळालेल्या महिला शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
या योजनेत अपघातामुळे झालेला अंतर्गत रक्तस्त्राव आणि उष्माघात यांचा नव्याने समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. योजनेसाठी यापुढे अपीलिय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्या ऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी राहतील. तसेच या योजनेत आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव स्वीकारण्यासाठी दोन महिन्यांची मुदत राहणार आहे. आर्थिक मदत थेट लाभ हस्तांतरण (Debit Transfer) पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

