- विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय (NCP) अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर करण्यात आलेल्या टीकेवरून माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. सुनेत्रा पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या टिप्पणीमधून काँग्रेसच्या मनातील द्वेष स्पष्टपणे दिसून आल्याचा आरोप त्यांनी केला.
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, “काँग्रेसने टीका करण्यापूर्वी स्वतःचा इतिहास पाहावा. इंदिरा गांधी (Indira Gandhi) देशाच्या पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्याविरोधातही अशाच प्रकारची वक्तव्ये करण्यात आली होती. मात्र त्यांनी आपल्या कामातून स्वतःला सिद्ध केले. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवारही आपल्या कामाच्या आणि अनुभवाच्या जोरावर स्वतःची छाप पाडतील.”
बीड दौऱ्याबाबत बोलताना मुंडे यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांचा दौरा हा पालकमंत्री म्हणून अधिकृत होता. दौऱ्यापूर्वीच प्रसारमाध्यमांना लेखी स्वरूपात माहिती देण्यात आली होती की, पत्रकार परिषद होणार नसून केवळ निवेदन करण्यात येईल.
“त्या प्रथमच बीडमध्ये अधिकृत दौऱ्यावर आल्या होत्या. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांसाठी त्या उपस्थित राहिल्या. निवेदनादरम्यान अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कामांचा उल्लेख झाल्यावर त्या भावूक झाल्या. त्यावेळी मी केवळ वातावरण शांत राहावे म्हणून त्यांना थांबण्याची विनंती केली. यात हुकूमशाहीचा प्रश्नच येत नाही,” असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – Punjab: दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, ‘आयएसआय’शी चार अल्पवयीनांसह ९ जणांना अटक)
बीडमधील प्रसारमाध्यमांबाबतही त्यांनी भूमिका मांडली. “बीडमधील ९५ टक्के पत्रकार प्रामाणिकपणे काम करतात. मात्र काही जणांना जिल्ह्यातील राजकारणातील तणाव कायम ठेवायचा आहे. त्यासाठी ते कोणतीही संधी सोडत नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.
आपल्या प्रकृतीबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “माझ्या प्रकृतीत झालेली सुधारणा हा वैद्यकीय उपचारांचा परिणाम आहे. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही,” असे त्यांनी सांगितले.
माध्यमांकडे आवाहन करताना मुंडे म्हणाले, “माझ्या भाषणातील संपूर्ण संदर्भ समजून घ्यावा. केवळ टीका करण्यासाठी काही वाक्ये वेगळी काढण्याऐवजी माझ्या भूमिकेचा सार आणि तर्क लक्षात घेऊन चर्चा व्हावी.”
काँग्रेसला (Congress) उद्देशून त्यांनी शेवटी पुन्हा एकदा टोला लगावत म्हटले, “अधिकृत सोशल मीडिया पेजवरून टीका करण्यापूर्वी काँग्रेसने स्वतःच्या राजकीय इतिहासाचेही आत्मपरीक्षण करावे.”
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

