Pune:पुणे शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढत आहे, मात्र महापालिकेकडून दुरुस्त केलेले खड्डे २४ तासही टिकत नाहीत. परिणामी चालकांवर जीव मुठीत घेऊन वाहने चालवण्याची वेळ आली आहे. खड्ड्यांमुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील मंगळवार पेठ, कसबा पेठ, रविवार पेठ, कोथरुडमध्ये परमहंस नगर, अण्णा भाऊ साठे चौक, पीएमटी बस थांबा, एसएनडीटी परिसर, पौड रस्ता, कोथरूड डेपो, एकलव्य कॉलेज रोड, शांतीबन चौक, राजा शिवराय प्रतिष्ठान भुयारी मार्ग ते मोरे विद्यालय परिसर, आंबेगाव येथे दत्तनगर चौक, जांभुळवाडी रस्ता, नऱ्हेकडे जाणारा रस्ता, आंबेगाव भुयारी मार्ग ते शिवसृष्टी, सिंहगड कॉलेज परिसर, कात्रज परिसरामध्ये राजस सोसायटी ते वरखेडे नगर रस्ता, गोकुळनगर चौक ते खंडोबा मंदिर, विद्यानगर डिपी रस्ता, राजस सोसायटी ते यशश्री सोसायटी, सातारा रस्ता, मांगडेवाडी रस्ता, शेलार मळा, महादेव नगर, कोंढव्यात सोमजी चौक ते मुख्य गावठाण, कोंढवा खुर्द, येवलेवाडी या ठिकाणी खड्ड्यांचे अक्षरशः साम्राज्य पसरले आहे. बावधन, बाणेर, बालेवाडी, औंध या परिसरासह चांदणी चौक ते वारजे-माळवाडी सेवा रस्ता, वारजे उड्डाणपूल ते रामनगर, रामनगर ते दांगट इंडस्ट्रीअल रस्ता यासह विविध ठिकाणी रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. केवळ मुख्य रस्तेच नव्हे, तर अंतर्गत रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दुचाकीस्वारांना वाहने चालविताना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.ऐन रहदारीच्यावेळी खड्ड्यांमधुन जाताना वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसत आहे. विद्यार्थी, नोकरदारांना वेळेत पोहोचणे मुश्किल होत असल्याची सद्यःस्थिती आहे. इतकेच नव्हे, तर खड्ड्यांमुळे लहान मुले, गरोदर माता, वृद्ध नागरिक, रुग्णांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची सद्यःस्थिती आहे.
रस्तादुरुस्ती केवळ नावालाच…
पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत वाहिन्यांसह विविध सेवा कामांसाठी खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्त करा, महत्त्वाच्या कांमांव्यतिरिक्त रस्ते खोदाईस परवानगी देऊ नका, असे आदेश महापालिका आयुक्तांनी महापालिका प्रशासनास दिले होते. त्यानंतरही ऐन पावसाळ्यात ठिकठिकाणी खोदाईची कामे सुरू होती, तर खोदाई करण्यात आलेले रस्ते, पदपथ व्यवस्थित दुरुस्त करण्यात आले आहेत. परिणामी शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरदेखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. संबंधित खड्ड्यांमुळे शहरातील वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला आहे. महापालिकेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जात असल्याचा दावा केला जात आहे, मात्र दुरुस्त केलेले रस्ते जोरदार पावसामुळे खराब होत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

