- कल्याण : प्रतिनिधी
कल्याण (Kalyan) शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीचा (Traffic jam) फटका आता सांस्कृतिक क्षेत्रालाही बसू लागला आहे. कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात रविवारी संध्याकाळी चार वाजता गाजलेले ऑल दि बेस्ट हे नाटक सादर होणार होते. रंगमंदिर रसिक प्रेक्षकांनी गच्च भरलं होते. मात्र नाटकातील कलाकारांची गाडी कल्याणच्या मुख्य मार्गावरील भीषण वाहतूक कोंडीत अडकल्याने हा प्रयोग तब्बल दीड तास उशिराने सुरू करावा लागला.
निश्चित वेळेत पडदा न उघडल्याने प्रेक्षकांमध्ये सुरूवातीला संभ्रम आणि नंतर नाराजीचे सूर उमटले. काही रसिकांनी वेळेचा अपव्यय झाल्याची खंत व्यक्त केली, तर काहींनी कलाकार नक्कीच येतील या विश्वासाने संयमाने जागेवर बसून वाट पाहिली. अखेर दीड तासानंतर कलाकार रंगमंदिरात दाखल होताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले आणि प्रयोगाला सुरुवात झाली.
(हेही वाचा – Dombivli मध्ये झाडे कोसळण्याचे सत्र सुरूच; शाळेच्या संरक्षक भिंतीवर कोसळले भलेमोठे झाड)
प्रयोग संपल्यानंतर कलाकारांनी मंचावर येऊन प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली. आम्हालाही वेळेत पोहोचायचे होते. मात्र रस्त्यावरील कोंडीमुळे अडकून पडलो. तुमच्या संयमामुळे आजचा प्रयोग पार पडला, त्यासाठी मनापासून आभार, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
या एका घटनेतून कल्याणमधील (Kalyan) वाहतूक समस्या केवळ सामान्य नागरिकांनाच नाही तर कला, संस्कृती आणि करमणुकीच्या क्षेत्रालाही अडचणीत आणत असल्याचे दिसून आले आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

