महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील आणि देशातील विविध राजकीय घडामोडींवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. या भाषणादरम्यान त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
अयोध्येतील राम मंदिर आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर या दोन्ही धार्मिक स्थळांवरील कथित अपहार व चोरीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणात सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले एक पत्र वाचून दाखवले. या पत्रातील मुद्द्यांच्या आधारे त्यांनी मंदिरातील गैरव्यवहारावर बोट ठेवले. कर्मचारी पकडण्यापूर्वी दर बुधवारी दानपेटीतील रकमेची मोजदाद ५० लाख रुपयांच्या आत होत असे. मात्र, कारवाईनंतर गेल्या तीन आठवड्यांत हीच रक्कम दर बुधवारी सुमारे १.५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. दर आठवड्याला होणाऱ्या या चोरीमुळे मंदिराचे दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांचे नुकसान होत होते. या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असू शकतात असा संशय व्यक्त करत, विश्वस्त मंडळाने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
सामान्य भाविक अत्यंत श्रद्धेने मंदिरात जातात, नोकरी आणि परीक्षांमध्ये यशासाठी देवाकडे प्रार्थना करतात आणि दानपेटीत पैसे टाकतात. पण त्याच मंदिरात अशी लूट सुरू आहे. मंदिरातीलच माणसे मंदिरे लुटत आहेत. हा आमचा धर्म आहे का? देशातील मंदिरांची जर अशी परिस्थिती असेल तर आपण सर्वांनी मिळून यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. याशिवाय, अयोध्येतील राम मंदिरात १४०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी मौन का बाळगून आहेत, असा सवालही उपस्थित केला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या या वक्तव्यामुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
Join Our WhatsApp Community

