Mumbai water crisis : मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा लांबल्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील उपलब्ध पाणीसाठा धोकादायक पातळीवर घसरला असून, 11 टक्क्यांच्या आसपास पोहोचल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे शहर आणि उपनगरांत पाणी टंचाईचे भीषण सावट पसरले आहे. यामुळे आधीच लागू असलेल्या 10 टक्के पाणी कपातीनंतर महापालिका आणखी कठोर उपाययोजनांचा विचार सुरू झाला आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली असून पाण्याचा अपव्यय रोखणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त पाणी कपातीचा पर्याय यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
सात तलावांतील साठा झपाट्याने घसरला
मुंबईचा पाणीपुरवठा अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांवर अवलंबून आहे. जूनच्या सुरुवातीला तलावांमध्ये सुमारे 13 ते 14 टक्के पाणीसाठा होता. मात्र पावसाअभावी तो आणखी कमी झाला आहे. काही अहवालांनुसार हा साठा 10.7 टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
मान्सूनबाबतच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, BMC ने 15 मेपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू केली आहे. या निर्णयाचा परिणाम केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून ठाणे आणि भिवंडी-निजामपूर महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांवरही झाला आहे.
पाण्याचा अपव्यय केल्यास कारवाई
महापालिका प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच वाहन धुणे, बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर, सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा अपव्यय यांसारख्या प्रकारांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे.
मुंबईच्या पाणीपुरवठ्याची दररोजची गरज सुमारे 4,000 ते 4,200 दशलक्ष लिटर इतकी आहे. तलावांमधील साठा सातत्याने कमी होत असल्याने आता सर्वांच्या नजरा मान्सूनच्या सक्रियतेकडे लागल्या आहेत. येत्या काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. अन्यथा पाणीपुरवठ्यावरील निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा: Pune Water Shortage : पुण्यात कधी येणार पाणी? सम-विषम तारखेनुसार पाणी कपातीचे नवे वेळापत्रक जारी
प्रशासनाची नागरिकांना सूचना
- पिण्याचे पाणी अत्यावश्यक कामांसाठीच वापरा
- गळती होत असलेले नळ तातडीने दुरुस्त करा
- वाहन धुण्यासाठी किंवा साफसफाईसाठी पाण्याचा अपव्यय टाळा
- पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी बचतीच्या उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करा
मुंबईतील तलावांमधील पाणीसाठा वेगाने कमी होत असल्याने यंदाचा पावसाळा शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील काही दिवसांतील पावसावरच पाणी कपातीचे पुढील निर्णय अवलंबून असतील.
Join Our WhatsApp Community

