
Terrorism to Pakistan: भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर कठोर इशारा दिला आहे. शनिवारी आयोजित ‘सेना संवाद’ कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि भारतविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या, तर त्यांना ठरवावे लागेल की त्यांना नकाशात राहायचे आहे की इतिहासात जमा व्हायचे आहे.
‘युनिफॉर्म अनव्हील्ड’ संस्थेतर्फे आयोजित या सिव्हिल मिलिटरी संवाद कार्यक्रमात जनरल द्विवेदी यांना भविष्यात ‘ऑपरेशन सिंदूर’सारखी परिस्थिती निर्माण झाल्यास हिंदुस्थानी लष्कराची भूमिका काय असेल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी कठोर भूमिका मांडली. “भारत आपल्या सुरक्षा आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आवश्यक ते सर्व पाऊल उचलण्यास तयार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
द्विवेदी म्हणाले की, आधुनिक युद्ध आता फक्त जमीन, आकाश आणि समुद्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. आता सायबर, अंतराळ आणि मानसिक स्तरावरील युद्धही तितकेच महत्त्वाचे झाले आहे. त्यांनी सांगितले की, हिंदुस्थानी लष्कराने २०२६-२७ हे वर्ष ‘नेटवर्किंग आणि डेटा सेंट्रिसिटी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. नवीन तंत्रज्ञान आणि माहितीआधारित युद्धक्षमता मजबूत करण्यावर लष्कराचा भर आहे.
कठीण समस्यांवर सोपे उपाय शोधण्यासाठी लष्कराला तरुण पिढीची मदत हवी आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, देशभरात झालेल्या डिफेन्स सरावामध्ये एनसीसी कॅडेट्सनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही लष्करप्रमुख म्हणाले.
हेही पहा –

