Athletics World Championship : ॲथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत करणार दावा

स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताने अर्ज केल्याचं नीरज चोप्राने म्हटलं आहे, आणि सगळं व्यवस्थित झालं तर २०२७च्या स्पर्धा भारतात होऊ शकतील. 

76
Athletics World Championship : ॲथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत करणार दावा
Athletics World Championship : ॲथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत करणार दावा

ऋजुता लुकतुके

जागतिक स्तरावरील एक मानाची क्रीडा स्पर्धा असलेली ॲथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धा भारतात व्हावी असा भारताचा प्रयत्न आहे. आणि २०२७ च्या स्पर्धेसाठी भारत यजमानपदावर दावा करणार असल्याचं भालाफेकपटू नीरज चोप्रानेही म्हटलंय.

नीरजने अलीकडेच झ्युरिच इथं ८८.१७ मीटरची भालाफेक करून डायमंड लीग सुवर्णपदक जिंकलं. तर त्यापूर्वी नीरजने विश्व अजिंक्यपद सुवर्णही जिंकलं आहे. या कामगिरीनंतर पत्रकारांशी बोलताना नीरजने ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा भरवण्याचा भारताचा निर्धार बोलून दाखवला. पत्रकारांनी नीरजला थेट प्रश्न विचारला की, भारत अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनासाठी उत्सुक आहे का? यावर नीरजनेही वेळ न दवडता उत्तर दिलं. ‘हो. आम्ही प्रयत्न करतोय. आणि मी सर्व चाहत्यांना विनंती करतो की त्यांनी मोठ्या संख्येनं स्पर्धेला प्रतिसाद द्यावा,’ असं नीरज म्हणाला.

(हेही वाचा- Chandrayan 3 : चंद्रयान-३ च्या ‘मोहिमेचे उरले फक्त सात दिवस)

भारतीय चाहते खेळ आणि खेळाडूला प्रोत्साहन देणारे आहेत. आणि आता त्यांना भालाफेकीबद्दल कुतुहलही आहे, असं नीरज म्हणाला. आणि त्याचवेळी नीरजला असंही वाटतं की भारतीय प्रेक्षकांनी आता ॲथलेटिक्स बद्दलही माहिती करून घ्यावी. ‘ॲथलेटिक्स म्हणजे फक्त भालाफेक नव्हे. यात भरपूर प्रकार आहेत. आणि भारतीय लोकांनी आता ॲथलेटिक्स बद्दल माहिती करून घ्यायला हवी असं मला वाटतं. आणि म्हणून मी भारतीय चाहत्यांना आवाहन करतो की, भारतात स्पर्धा व्हावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावेत. आणि चाहत्यांनीही स्पर्धा यशस्वी करावी,’ असं नीरज म्हणाला.

भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने खरंतर २०२७ च्या अजिंक्यपद स्पर्धा आयोजनासाठी दावा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पण, त्यासाठी लागणारी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची परवानगी अजून फेडरेशनने घेतलेली नाही. यजमानपदाचा दावा करण्याची अंतिम मुदत २ ऑक्टोबर आहे. पण, अजून ॲथलेटिक्स फेडरेशनने क्रीडा मंत्रालयाकडे तसा अर्जही केलेला नाही. दुसरीकडे चीनमधील एक शहर बीजिंगने यापूर्वीच २०२७च्या अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाची तयारी दाखवली आहे. त्यामुळे भारताला यजमानपदासाठी स्पर्धा असणार हे नक्की आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.