मनमानी करणाऱ्या बेस्टच्या अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम

145

अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आम्हाला त्रास होत असल्याचा आरोप दिंडोशी बेस्ट आगारातील कामगारांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी भाजप बेस्ट कामगार संघटनेचे सल्लागार सुनील गणाचार्य यांच्याकडे तक्रारही केली आहे. याची दखल घेऊन सुनील गणाचार्य यांनी ६ एप्रिल २०२२ रोजी दिंडोशी आगाराला भेट देत येथे कामगारांना होणारा त्रास व अत्याचाराबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला. पोलीस बंदोबस्तात जवळपास दीड तास बेस्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसह ही बैठक सुरू होती अशी माहिती बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

( हेही वाचा : बेस्ट अधिकाऱ्यांच्या मनमानीला लागणार चाप? )

अधिकाऱ्यांना जाब विचारला

बस क्रमांक ५२३ (दिंडोशी- ऐरोली) आणि बस क्रमांक ७१८ (दिंडोशी- भाईंदर) या बस मार्गांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून दिंडोशी आगारात नवीन आलेल्या अधिकाऱ्यांनी अतिरिक्त काम करून घेतले. दिंडोशी आगारात दिवसेंदिवस कर्मचारी तसेच बसेसची संख्या कमी होत आहे. याउलट प्रवासी संख्या मात्र वाढत आहे. यामुळेच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आला आहे. त्यामुळेच कामगारांचा जीव जाईपर्यंत मनमानी पद्धतीने काम करून घेतले जाणार आहे का असा सवाल आगारातील कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला होता. यावर भाजप बेस्ट कामगार संघटनेचे सल्लागार सुनील गणाचार्य यांनी कामगारांच्यावतीने या आगाराला भेट देत अधिकाऱ्यांना जाब विचारला तसेच अधिकाऱ्यांना एक महिन्याची मुदत दिली. एक महिन्यात जर या समस्यांवर तोडगा काढत सोडवल्या नाहीत तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

दिंडोशी आगारातील अधिकाऱ्यांच्या दबावामुळे होणारा शारीरिक व मानसिक त्रासाविरोधात आवाज उठवण्यासाठी मोठ्या संख्येने बेस्ट कामगार आगारात उपस्थित होते. या बैठकी दरम्यान भाजपच्या प्रिती सातम या स्थानिक नगरसेविका सुद्धा उपस्थित होत्या.

कामगारांना कोणत्याही प्रकारचा शारीरिक व मानसिक त्रास होऊ नये. ज्याकाही समस्या आहेत त्या अधिकारी म्हणून तुम्ही सोडवल्या पाहिजेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.