Maharashtra Din 2024 : जातीचं राजकारण आवळत आहे ‘मराठी’चा गळा!

मराठी भाषेला राजभाषा हा सन्मान मिळाला त्याला ५९ वर्ष होत आहेत. पण ‘वस्तू भेटली’, ‘माझी मदत करशील का?’ आणि ‘तो व्यक्ती’च्या या काळात आपण राजभाषेचा सन्मान राखतो आहोत का हाच मुळात प्रश्न आहे.

185
Maharashtra Din 2024 : जातीचं राजकारण आवळत आहे ‘मराठी’चा गळा!
  • मंजिरी मराठे

महाराष्ट्राचा अभिमान असलेली आपली मराठी. मुसलमानी राजवटीत उर्दू, पर्शियन शब्दांनी मराठी भाषेवर आक्रमण केलं. पण छत्रपती शिवरायांनी रघुनाथ पंडितांकडून राजभाषा कोश तयार करवून घेतला. राजव्यवहार मराठीत होऊ लागला. नानासाहेब पेशवे, मोरोपंत अशा अनेकांनी मराठी भाषाशुद्धीची चळवळ पुढे नेली. निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ती पालखी इतकी सक्षमपणे पेलली की त्यांना ‘मराठी भाषेचे शिवाजी’ ही पदवीच दिली गेली. केवळ व्यवहारातीलच नव्हे तर शास्त्रीय परिभाषेतील शब्दही मराठीत वापरले जाऊ लागले. पुढे ब्रिटिशांचं राज्य आलं. त्यावेळी जवळजवळ एक पिढीच इंग्रजाळली तरीही मराठी आपला मान राखून होती. पण काँग्रेसच्या मुस्लीमधार्जिण्या धोरणामुळे मराठीच नव्हे तर हिंदी भाषेवरही उर्दू, पर्शियन शब्दांचं आक्रमण झालं. (Maharashtra Din 2024)

छत्रपती शिवराय या आपल्या दैवताप्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेवरच्या आक्रमणाविरुद्ध भाषाशुद्धी चळवळ सुरु केली. १९२५ मध्ये ‘केसरी’त त्यांनी या विषयी लेखमाला लिहिली. सुरुवातीला त्याविरोधी सूर उमटला, साहित्य क्षेत्रात खळबळ माजली. सावरकरांनी विरोधकांच्या आक्षेपांना आपल्या लेखातून उत्तरं दिली. कवी माधव ज्युलियन यांच्या कवितेत भरपूर फारसी शब्द असत. तेही सावरकरांच्या विरोधात होते पण पुढे मात्र ते देखील भाषाशुद्धीचा पुरस्कार करू लागले. इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या कविता पुन्हा शुद्ध मराठीत लिहून काढल्या. त्यांच्या लेख आणि भाषणांचं ‘भाषाशुद्धी विवेक’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं. उर्दू आणि फारसी शब्दांना मराठी प्रतिशब्द असलेले कोश माधव ज्युलियन आणि अ. स. भिडे यांनी सिध्द (तयार) केले. (Maharashtra Din 2024)

(हेही वाचा – Deepika Kumari in TOPS : स्पर्धात्मक तिरंदाजीतील पुनरागमनानंतर दीपिका कुमारीचा टॉप्समध्ये समावेश)

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वत:च अनेक नवीन प्रतिशब्द निर्माण केले, काही जुने पुनरुज्जीवित केले. सावरकरांनी निर्माण केलेले महापौर, हुतात्मा, दिग्दर्शक, कलागृह, छायाचित्रण, दिनांक, क्रमांक असे अनेक शब्द सहज रुळले आहेत. आक्रमणकर्त्याचं आक्रमण केवळ देशावर नसतं तर ते संस्कृती आणि भाषेवरही होत असतं. आता तर आपण स्वतंत्र आहोत, आपलं महाराष्ट्र राज्य आहे, आपली मराठी भाषा आहे. पण जातीपातीच्या राजकारणानं देश, विशेषकरून महाराष्ट्र पुन्हा पोखरला गेला आहे आणि त्याचा फटका मराठी भाषेला बसतो आहे. जातीचं राजकारण मराठी भाषेचाही गळा आवळत आहे. आज ब्राह्मणी भाषाच का प्रमाण मानायची हा विचार बोकाळला आहे. यात भाषेवरचं प्रेम नाही तर ब्राह्मण द्वेष भरलेला आहे. मराठी भाषा केवळ ब्राह्मणांची थोडीच आहे. ती समस्त मराठी माणसाची आहे. पण केवळ आकसापोटी मराठी शब्द न वापरता, चांगले शब्द उपलब्ध असतानाही इंग्रजी शब्द वापरले जातात तेव्हा विद्रूप होते तुम्हा आम्हा सगळ्यांचीच मराठी. (Maharashtra Din 2024)

आपल्या भाषाभगिनी किंवा बोलीभाषेतील शब्द मराठीत रूढ झाले तर कोणीच आक्षेप घेणार नाही. उलट त्यामुळे मराठी भाषा (Marathi language) समृद्धच होत जाईल. क्रिकेटचंच उदाहरण घेऊ. त्याला अगदी चेंडूफळीचा खेळ म्हणावा ही अपेक्षा नाही. पण फलंदाज, गोलंदाज, फलंदाजी, गोलंदाजी, यष्टिरक्षक, धावचीत, पायचीत, चौकार, षटकार असे असंख्य सुंदर शब्द उपलब्ध असताना इंग्रजी शब्द वापरण्याचा अट्टहास का? तर बहुजनांची भाषा हवी. इंग्रजी ही तर बहुजनांची भाषा नाही, मग हट्टाने इंग्रजी शब्द वापरून आपलीच भाषा विद्रूप का करतो आहोत? बातम्या, मालिका या माध्यमातून या विचारांचा प्रसार आणि प्रचार होतो आहे. विशिष्ट विचारसरणीची माणसं हे जाणूनबुजून घडवत आहेत, त्यांना बदलणं आपल्या हाती नाही पण निदान आपण प्रत्येकानं, अगदी ब्राह्मणी नको, पण शुद्ध बोलायचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. केवळ दुकानांवरच्या पाट्या मराठीत लिहून हे होणार नाही. मराठी कशी जिवंत राहणार अशा चर्चा करूनही ते साधणार नाही तर ‘मराठी राजभाषा दिना’च्या निमित्तानं आपण प्रत्येकानं जातीपातीच्या पलीकडे जाऊन मराठीला तिचा सन्मान परत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध होऊया, शुद्ध मराठी बोलूया. (Maharashtra Din 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.