प्रशासन अलर्ट मोडवर! कोकणात मुसळधार पाऊस; वाहतूक ठप्प, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

98

राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकणात देखील पावसाने चांगलाच जोर धरला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजेच ५ ते ८ जुलै या कालावधीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर असा कायम राहिला तर कोकणात पाणी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. वाढत्या पावसामुळे कोकणात NDRF ची पथकं दाखल झालेली आहे.

( हेही वाचा : चौपदरीकरण झालेला मुंबई-गोवा महामार्ग पहिल्या पावसात दुभंगला! कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह)

सतर्कतेचा इशारा

चिपळूणमध्ये गेल्या तीन तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे चिपळूणच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी राजापूर, लांजा, मंडणगड, खेड या भागात सततच्या पावसामुळे नद्यांना पूर येऊन मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अपुऱ्या चौपदरीकरणाचा फटका महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी घाट बंद करून पर्यायी लोटे-कळबस्त्र मार्गाने वाहतूक वळवण्यात आली होती. परंतु पावसाचा जोर वाढल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वैभववाडी रेल्वे स्थानकातील रुळांवर पुराचे पाणी आल्यामुळे रेल्वे सेवा सुद्धा ठप्प झालेली आहे.

एनडीआरएफ तैनात

महाड, चिपळूण, ठाणे या भागात एनडीआरएफ ( NDRF) पथके दाखल झालेली आहे. गेल्यावर्षी महाड-चिपळूणमध्ये महापूर आला होता या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील खेड जगबुड नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.