मुंबईत पुन्हा होणार नाही ‘अमरापूरकर’ दुघर्टना; ३६७९ मॅनहोल्सना जाळ्यांचे संरक्षण

106

मुंबईत आतापर्यंत एकूण ३ हजार ६७९ मॅनहोलवरील झाकणाखाली सुसज्ज व मजबूत अशा प्रकारची संरक्षक जाळी लावण्याची कार्यवाही पूर्ण झाली असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे यापुढे मुंबईत मॅनहोलमध्ये पडून दुघर्टना झालेल्या डॉ दिपक अमरापूरकर यांच्यासारखी घटना घडणार नाही. विशेष म्हणजे सन २०२० पर्यंत २९९२ मॅनहोलमध्ये जाळ्या बसवण्याची कार्यवाही पूर्ण करणाऱ्या महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाला दोन वर्षांमध्ये केवळ ९०७ जाळ्या बसवता आल्या आहेत.

( हेही वाचा : दुकानांमधील सेल्फ टेस्टिंग कोविड किटकरता लवरकच एसओपी)

सर्व रस्‍त्‍यांची पाहणी करुन मॅनहोलची तपासणी

डॉ दिपक अमरापूरकर यांचे एलफिन्सटन येथील सेनापती बापट मार्गावरील रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने उघड्या मॅनहोल्समध्ये पडून झालेल्या अपघात मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर गटारांच्या मॅनहोल्सच्या डघड्या झाकणाचा मुद्दा एैरणीवर आला आणि याप्रकरणी महापालिकेला न्यायालयानेही कडक शब्दात सुनावले होते. मात्र अमरापूरकर यांचा अपघात झालेले ते झाकण आसपासच्या रहिवाशांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी काढून टाकले होते, असे समारे आले होते.

मुंबईतील पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून दरवर्षी सर्व ठिकाणच्या मॅनहोलची तपासणी करून आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येते. यंदादेखील ठिकठिकाणी असलेल्या मॅनहोलची तपासणी करुन दुरुस्ती करणे, आवश्यक तेथे नवीन मॅनहोल लावणे ही कामे हाती घेण्यात आली आहेत. जोरदार पावसानंतर आणि पाण्याचा निचरा झाल्यानंतर देखील महानगरपालिकेच्‍या वतीने पुन्‍हा एकदा सर्व रस्‍त्‍यांची पाहणी करुन मॅनहोलची तपासणी केली जाते.

या नियमित उपाययोजनांसोबतच मॅनहोलच्या झाकणाखाली प्रतिबंधक स्वरुपाची संरक्षक जाळी लावण्याची कार्यवाही मुंबईत टप्प्याटप्प्याने सुरु आहे. आजपर्यंतचा विचार करता संपूर्ण मुंबईत मिळून ३ हजार ६७९ मॅनहोलवर झाकणाखाली संरक्षक जाळी लावण्यात आली आहे. यामध्ये मुंबई शहर विभागात २ हजार ९४५, पूर्व उपनगरात २९३ तर पश्चिम उपनगरात ४४१ मॅनहोलवर संरक्षित जाळ्या लावल्‍या आहेत, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प ) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

महापालिकेचे आवाहन

पावसाळ्यामध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचल्यास कोणत्याही मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी स्‍वतःहून परस्पर काढू टाकू नयेत. त्यातून दुर्घटना घडू शकतात. मॅनहोलवरील झाकण नागरिकांनी काढल्यास संबंधित नागरिकांविरुद्ध महानगरपालिका प्रशासन योग्य ती कारवाई करेल, असा इशारा देण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई महानगरात जोरदार पावसाप्रसंगी सखल भागात पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असते. त्यावेळी महानगरपालिकेचे संबंधित विभागातील कर्मचारी पावसाच्‍या पाण्‍याचा निचरा लवकर व्‍हावा म्‍हणून सदर मॅनहोल उघडतात आणि तेथे धोक्‍याची सूचना देणारे फलक देखील लावलेले असतात. मात्र, कोणत्याही स्थितीत पाणी साचलेल्या ठिकाणी मॅनहोलवरील झाकणे नागरिकांनी स्‍वतःहून परस्पर काढून टाकू नयेत. कारण त्यातून अपघात घडू शकतात, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

जून २०२०मध्ये शहर भागातील २००८ मॅनहोल्सच्या जाळ्यांवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. तर पश्चिम उपनगराच्या रस्त्यांवरील मॅनहोल्सवर २९३ आणि पूर्व उपनगरातील मॅनहोल्सवर ३९९ अशाप्रकारे एकूण संपूर्ण मुंबईत २७७२ मॅनहोल्समध्ये संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोन वर्षांमध्ये केवळ ९०७ जाळ्या बसता आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.