Odisha Train Accident : ओडीशा ट्रेन अपघातानंतरचा धक्कादायक प्रकार आला समोर; नवरा जिवंत तरी सांगितले ‘हे’ कारण!

13 वर्षांपासून पतीपासून वेगळी राहत असलेल्या महिलेने रचला बनाव.

159

ओडीशाच्या बालासोर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी, 2 जून रोजी झालेल्या भयंकर अपघातात 280 पेक्षा जास्त प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना राज्य आणि केंद्र सरकारकडून मदतीचा हात देण्यात येत आहे, पण यातही काही असेही निह्रुदयी माणसे या जगात अस्तित्वात आहेत ते मृतांच्या टाळूवरचे लोणीही खाण्यास मागे पुढे धजावत नाहीत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मदतीची रक्कम मिळावी यासाठी एका महिलेने आपल्याच पतीच्या मृत्यूचा बनाव रचला. या महिलेच्या पतीने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली असून सध्या ही महिला फरार आहे.

कटक जिल्ह्याच्या मणियाबांदमधील निवासी गितांजली दत्ताने 2 जूनच्या रेल्वे अपघातामध्ये आपल्या पतीचे निधन झाले असा बनाव रचला. एवढे नाही तर तिने चक्क दुसऱ्या एका मृतदेहाची ओळख आपले पती हेच असल्याचा दावा केला. प्रशासनाने सर्व कागदपत्रे तपासली असता महिलेचा तो दावा खोडून काढला.

(हेही वाचा Mosque : इस्लामी राष्ट्र इराणमधील 50 हजार मशिदी झाल्या बंद)

पोलिसांनी संबंधित महिलेला इशारा देऊन सोडण्यात आले, पण पतीने तिची तक्रार केल्यामुळे त्या महिलेच्या अडचणीत वाढ झाली आहे. महिलेचा पती बिजय दत्ता यांनी मणियाबांदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच महिला अटकेच्या भितीने फरार असल्याचे सांगितले जाते. मागच्या 13 वर्षांपासून ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे.

गितांजलीने सरकारी पैसे हडपण्याचा प्रयत्न करणे तसेच आपल्याच पतीच्या मृत्यूचा खोटा बनाव करणे, अशा तक्रारी दाखल करण्यात आल्या असून गितांजलीच्या पतीने म्हणजेच बिजय दत्ताने तिच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना बालासोर जिल्ह्यात घडली असल्यामुळे मणियाबांदा पोलिसांनी बिजय दत्ता यांना बहानागा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.