भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची घोडदौड कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि डोंगराळ घाटमाथ्यांच्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याउलट, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी बरसतील, तर विदर्भामध्ये सध्या पावसाचा कोणताही मोठा इशारा देण्यात आलेला नाही. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. (Maharashtra Rain Alert)
(हेही वाचा – “इराणवर इतिहासातील सर्वात मोठा हल्ला करणार होतो, पण…”; Donald Trump यांचा मोठा दावा! अखेरच्या क्षणी काय घडलं?)
रायगडला ऑरेंज तर ठाणे-रत्नागिरीला यलो अलर्ट
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने तिथे खबरदारीचा उपाय म्हणून ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) जारी केला आहे. तसेच शेजारील ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ (Yellow alert) देण्यात आला आहे. राजधानी मुंबईसह पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यालगत जाणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
(हेही वाचा – Carlos Alcaraz ची दुखापतीमुळे सिनसिनाटी ओपनमधून माघार)
पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर अतिदक्षता
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर ढगफुटीसदृश मुसळधार पावसाची शक्यता असल्याने तिथे ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे, तर कोल्हापूरच्या घाटात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दुसरीकडे, नाशिकच्या पर्वतीय क्षेत्रांमध्येही जोरदार पावसाची शक्यता असल्याने पर्यटकांना काळजी घेण्यास सांगितले आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि धाराशिवसह इतर जिल्ह्यांत ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community


