‘या’ गावांत १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार

72

जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता १०/१२ वीचे वर्ग सुरू करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पहावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

‘त्या’ बालकांच्या शिक्षणाचा खर्च सरकार करणार

कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावी पर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

(हेही वाचाः सरकारचा पळ काढण्याचा प्रयत्न! दरेकरांचा आरोप)

मूल्यांकनाचा प्रस्ताव सादर करा

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्याकंन करताना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या १२वी च्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने इयत्ता १० वी साठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करुन, १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

बैठकीस शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.